रुपाली केळस्कर
श्रीलंकेतल्या ताज्या अराजकामागे सेंद्रिय शेतीचाही समावेश होता. कोणतीही तयारी न करता अचानक सेंद्रिय शेतीकडे वळल्यास किती नुकसान होतं, हे जगाने पाहिलं. पर्यावरणाच्या दृष्टीनं रासायनिक शेती तोट्याची असली तरी सेंद्रिय शेतीही एकाएकी फायद्याची ठरणार नाही. अशा वेळी एकात्मिक, सेंद्रिय व रासायनिक शेतीचा अवलंब केल्यास (एसेन्रा) पर्यावरणाचं नुकसानही कमी होईल आणि एकरी उत्पादकताही टिकून राहील.
सेंद्रिय शेती ही शेती आणि पर्यावरणाला जोडण्याची एक पद्धत आहे. या शेतीची संकल्पना जपानी शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका यांनी मांडली. फुकुओका यांनी जपानी भाषेत लिहिलेल्या ‘सीगेन नोहो’ या पुस्तकात या शेतीपद्धतीचं वर्णन केलं आहे. म्हणूनच या शेतीपद्धतीला ‘फुकुओका पद्धत’ असंही म्हणतात. या पद्धतीमध्ये ‘काहीही’ न करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे शेतीची मशागत करू नका, खत टाकू नका, कीटकनाशक वापरू नका किंवा तण काढू नका, असं सांगितलं जातं. भारतात या शेतीपद्धतीला ‘ऋषी फार्मिंग’ म्हणतात.
सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर केला जात नाही. मातीमध्ये अतिरिक्त पोषक तत्वं सोडली जात नाहीत. झाडांनाही दिली जात नाहीत. सूक्ष्म जीव आणि गांडुळांद्वारे सेंद्रिय पदार्थांचं विघटन करण्यास प्रोत्साहित केलं जातं. वर्षानुवर्ष शेतीत त्याच त्या पिकांची लागवड करणं, खतांचा बेसुमार वापर करणं, कीटकनाशकांचा वापर करणं आदीमुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे आणि शेतकर्यांना त्याचा थेट फायदा व्हावा आणि त्यांचं उत्पन्न वाढावं, यासाठी आपण वैज्ञानिक पद्धती ओळखणं महत्त्वाचं आहे. रसायनं आणि खतांच्या अतिवापरामुळे अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा उत्पादन खर्च वाढला आहे.
जगभरातलं वाढतं पर्यावरणीय संकट कमी करण्यासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती ही उपायकारक भूमिका बजावू शकते, असा शास्त्रज्ञांचा स्पष्ट विश्वास आहे. असं असलं, तरी नैसर्गिक आणि वैज्ञानिक शेतीची सांगड घातली नाही आणि एकाएकी एखाद्याच शेती पद्धतीचा पुरस्कार करणं अराजकाला निमंत्रण देण्यासारखं होऊ शकतं. श्रीलंकेत ते घडलं.
रसायनमुक्त शेती करणं चांगलं असलं तरी सुरुवातीला कमी होत जाणारी उत्पादकता आणि इतर शेती पद्धतीसारखाच मिळणारा भाव पाहता लोक सेंद्रिय शेतीचा अवलंब करणार नाहीत. सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने केल्या जाणार्या शेतीला महत्व येण्यासाठी पिकांचं सर्टिफिकेशन होणं आणि त्यांना इतर पद्धतीच्या शेतीपेक्षा जास्त भाव मिळणं अपेक्षित आहे. तसं झालं तरच मातीची उत्पादकता पुन्हा चांगली होईल. त्यासाठी चांगलं वाणही शोधायला हवं. केंद्रीय कृषी मंत्रालयाने अलिकडेच नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या मानकांची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मंत्रालय सध्याच्या ‘नॅशनल सेंटर फॉर ऑरगॅनिक फार्मिंग’ (एनसीओएफ) चं नामकरण ‘नॅशनल सेंटर फॉर ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग’ करण्याचा विचार करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लागवडीचा खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रगतीशील शेतकर्यांनी सक्षम पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीबाबतही बरंच संशोधन होत आहे. शेतकरी नवनवीन प्रयत्न करत आहेत.सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल्याने पर्यावरण, अन्न, जमीन, मानवी आरोग्य, पाण्याची शुद्धता सुधारण्यास मदत होते. शेती आणि फलोत्पादनामध्ये चांगल्या उत्पादनासाठी आणि रोगांचं उच्चाटन करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर आवश्यक मानला जातो; पण देशी शेती आणि फलोत्पादनामुळे या धारणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रोगांचं उच्चाटन करण्यासाठी कीटकनाशकं आवश्यक मानली जाऊ शकतात; परंतु त्यांच्यामुळे अनेक समस्या आणि गुंतागुंतही निर्माण झाली आहे. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती या दोन्ही पद्धती रसायनमुक्त आहेत. दोन्ही प्रणाली शेतकर्यांना वनस्पतींवर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वापरासह इतर कोणत्याही कृषी पद्धतींमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंधित करतात. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतींद्वारे रसायनविरहित आणि घरगुती कीटक नियंत्रण उपायांना प्रोत्साहन दिलं जातं. प्रत्येक शेतकर्याने सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास भारतीय समाजाच्या अनेक समस्या सुटू शकतात, हे स्पष्ट झालं आहे. वायू प्रदूषणाचं एक कारण म्हणजे कीटकनाशकांचा अतिवापर. कीटकनाशकं अनेक प्रकारचे कर्करोग, त्वचा रोग, डोळे, हृदय आणि पचनाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात. अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये बंदी घालण्यात आलेली कीटकनाशकं भारतात वापरली जात आहेत.
बहुतांश कृषी शास्त्रज्ञ आता सेंद्रिय शेती शेतकर्यांसाठी फायदेशीर आणि सुरक्षित मानू लागले आहेत. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाल्याने उत्पादनखर्चात कपात होते, पिकांची उत्पादकता वाढते. बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढल्याने शेतकर्यांचं उत्पन्नही वाढतं. सेंद्रिय शेतीमुळे शेती तोट्यातून बाहेर पडून फायदेशीर होऊ शकते, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे; परंतु शेतकर्यांना अद्याप प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही. बदलतं ऋतूचक्र पाहता शेतकर्यांनी कीटकनाशकांपासून मुक्त शेती आणि फळबागेचं तंत्र अवलंबण्याची गरज आहे. रासायनिक खतांद्वारे उत्पादित होणार्या फळभाज्यांमुळेही अनेक प्रकारचे रोग होत आहेत. अशा परिस्थितीत आता शेतकर्यांसह काही सुशिक्षित लोक पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. शेतीसाठी वापरलेलं तंत्र पराशर ऋषींनी दिलं. या पद्धतीच्या शेतीला सध्या ‘ऋषी कृषी’ म्हणून ओळखलं जातं. यामध्ये एक शेत व्यवस्थित नांगरल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने अनेक पिकं घेतली जातात. एकाच वेळी अनेक पिकं घेतल्याने पिकांचा परस्परांना फायदा होतो. उलटपक्षी, रासायनिक शेतीच्या विकासामुळे येणार्या काळात धान्य आणि जमीन दोन्ही विषारी होणार आहेत. आधुनिक खर्चावर आधारित शेती करून शेतकरी सुखी राहू शकत नाही. कारण त्यामुळे सर्व प्रक्रिया बाजारावर अवलंबून राहतात. मशागत, बी-बियाणं, खतं, रासायनिक कीटकनाशकं अशी सर्व खर्चाची साधनं बाजाराच्या हातात असतात. यासोबतच शेतमालाचा भाव बाजारच ठरवत असतो. अशा प्रकारे शेतकर्यावर सतत बाजारपेठेचा प्रभाव आहे.
दुसरीकडे, बाजार स्वतःच शेतकर्याचा माल खरेदी करतो आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ग्राहकांकडून नफा कमावतो. अशा प्रकारे बाजार शेतकरी आणि ग्राहक दोघांचही शोषण करते. बाजारातल्या मक्तेदारीमुळे देशाची कृषी अर्थव्यवस्था ढासळली आहे. उत्पादन वाढलं; पण शेतकर्यांचं उत्पन्न वाढलं नाही. हरितक्रांतीच्या नावाखाली सरकारं पुढे नेत राहिलेल्या शेतीपद्धतीमुळे अनेकांचं नुकसान झालं, भूजल पातळी घटली, जलप्रदूषण वाढलं, जमिनीची सुपीकता आणि जैवविविधता कमी झाली आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करत आहेत. देशात आधुनिक खर्चावर आधारित शेतीच्या पर्यायांमध्ये अनेक उपाययोजना केल्या जात होत्या. ते सेंद्रिय शेती, केंद्रीय शेती, शून्य बजेट शेती इत्यादी नावांनी ओळखलं जातं. याचा शेतकर्यांना अंशतः फायदाही होतो; पण ते शाश्वत उपाय नाहीत. भारतभूषण त्यागी यांच्यासारख्यांनी आधुनिक खर्चांवर आधारित शेतीला पर्याय शोधण्याच्या नादात मधमाशी पालन, कापड निर्मिती, जलसंधारण, बियाणेनिर्मिती, कृषी उत्पादन प्रक्रिया अशा अनेक गोष्टी केल्या. त्यांना शेतीत फारसा नफा मिळत नव्हता. निसर्गात कोणताही विरोधाभास नाही, कोणतंही रहस्य नाही, चमत्कार आणि सिद्धी नाही; परंतु पूरकता, उपयुक्तता आणि सतत समृद्ध व्यवस्था आहे. त्यामुळे पृथ्वी, झाडं-वनस्पती आणि प्राणी-पक्षी यांच्यात सुसंवाद आहे. ही पूरकता समजून घेणं ही शेतीची गरज आहे.
निसर्गात एका दाण्यापासून हजार दाणे तयार होण्याची प्रक्रिया घडते. भारतभूषण त्यागी म्हणतात, शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या खर्चापेक्षा आणि अनेक प्रकारच्या पद्धतींपेक्षा निसर्गाची उत्पादन पद्धत समजून घेणं महत्त्वाचं आहे. निसर्ग समजून घेऊनच आपण शेतीमध्ये शाश्वत बदल घडवू शकतो. आज देशाची वाटचाल नैसर्गिक शेतीच्या दिशेने होत आहे. त्यामुळे निसर्ग व्यवस्थेवर केंद्रित कृषी संशोधन, कृषी शिक्षण, कृषी धोरणाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. आधुनिक शेतीतल्या समस्या आणि आव्हानं ओळखून आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे.