वसंत चौलकर
अलिबाग तालुक्यातील, अष्टांगरांतील वरसोली गावातील दरवर्षी कार्तिक वद्य एकादशी पासून अमावस्येपर्यंत पाच दिवस भरणार्या विठोबाच्या यात्रेमुळे महाराष्ट्राच्या नकाशावर वरसोली गाव प्रसिद्धीला आले. ऐतिहासिक अशा या वरसोली गावात राघोजी आंग्रे यांनी विठोबाचे मंदिर बांधले. सन 1778 मध्ये नर्मदाबाई आंग्रे यांनी विठोबा, रखुमाई, गरुड या तीन मूर्तींची स्थापना केली; तसेच त्यांनी आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी असे दोन उत्सव सुरु केले. सन 1840 मध्ये उत्सवापूर्वी मंदिराला रंगरंगोटी करीत असताना शिखर कोसळले व त्याखाली रंगारी चेंगरुन मरण पावला. या दुर्घटनेचे दुःख जनतेने विसरुन जावे यासाठी आंग्रेंनी विठ्ठल मंदिराच्या पटांगणात यात्रा सुरु केली.
तत्कालिन परिस्थितीत आंग्रेंनी सुरु केलेल्या या यात्रेला दोनशे वर्षांची परंपरा असून ती आजतागायत विनाखंड पाच दिवस भरत असते. काही वेळा नैसर्गिक अडचणी आल्या तरी यात्रा भरण्याचे बंद झाले नाही, एकदा तर कॉलरासारखी भयंकर साथ आली असता काही खाद्यपदार्थ मेवा मिठाईची दुकानावर बंदी आली होती. फक्त करमणूकीची, मनोरंजनाच्या खेळांना दिलेल्या परवानगीमुळे यात्रा थोड्या फार प्रमाणात तरी झाली. त्यानंतरच्या अलिकडच्या काळात गॅसने फुगा फुगविण्याच्या मुळे सिलेंडरचा स्फोटाने जत्रेत हाहाकार उडाला होता. अशीही वाईट दुर्घटना घडली होती. त्यानंतरच्या काळात यात्रेला सुरुवात होणार्या एक दिवस अगोदर निसर्गाची अवकृपा झाली; फयान नावाचे वादळ येऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे यात्रेसाठी आलेले व्यावसायिक संकटात सापडले. जनतेत यात्रा होणार नाही याची चिंता लागून राहिली. अशाही परिस्थितीत मंदिर व्यवस्थापनाने नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत बदल होईल याची अपेक्षा धरुन यात्रा सुरु होण्याची तारीख आठ दिवसांनी पुढे वाढविली. त्याप्रमाणे पांडुरंगांच्या कृपेने पुढे ठरलेल्या तारखेप्रमाणे यात्रा सुरु होऊन पाच दिवस सुरळीत पार पडली. व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे यात्रेला खंड पडला नाही.
वरसोली अलिबाग शहराला लागूनच असलेले शहराच्या उत्तरेकडील गाव वरसोलीकडे जाणारा रस्ता रामनाथ कुंभार आळीतून जातो. आमच्या घरापासूनच यात्रेला सुरुवात होते. पूर्वी ही यात्रा फक्त देवस्थानच्या व ग्रामपंचायतीत हद्दीत भरत असे. व्यावसायिकांची सेवा वाढली. बदल्या काळानुसार यात्रेत विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणार्या व्यावसायिकांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायत हद्द सोडून व्यावसायिक अलिबाग वरसोली रस्त्यावर कडेला रामनाथ कुंभारआळीत आपली दुकाने थाटू लागले. त्यामुळे ही यात्रा आता अलिबाग नगरपरिषद, वरसोली व चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील झाली आहे. लहानपण, तरुणपण, सांसारिक जीवनाचा काळ व आता ज्येष्ठ नागरिक या महत्त्वाच्या सार्या टपर्यांवर यात्रेच्या गोड व सुखद स्मृती मी अनुभवल्या आणि घराच्या परिसरात असणार्या यात्रेचा मनसोक्त आनंद लुटण्याचे भाग्य मला मिळाले हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे आणि यात्रेचा अनुभव आनंद या लेखातून आपल्या समोर मांडत आहे.
लहानपण, तरुणपण सांसारिक जीवनाचा काळ व आता ज्येष्ठ नागरिक या महत्त्वाच्या सार्या टपर्यांवर यात्रेच्या गोड व सुखद स्मृती मी अनुभवल्या आणि घराच्या परिसरात असणार्या यात्रेचा मनसोक्त आनंद लुटण्याचे भाग्य मला मिळाले हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे आणि यात्रेचा अनुभव आनंद या लेखातून आपल्यासमोर मांडत आहे.
एकदा का दिवाळीच्या सणाची सांगता झाली की, वेध लागतात ते जत्रा यात्रांचे रायगड जिल्ह्यातील पहिली यात्रा खालापूर तालुक्यातील साजगावच्या बोंबल्या विठोबाची, त्याच्यानंतर तीन दिवसांनी आवासच्या नागेश्वराची, पर्वतावरील कनकेश्वराची एक-एक दिवसांची यात्रा झाल्यानंतर वरसोलीच्या विठोबाची यात्रा 5 दिवस भरते. यात्रेसाठी असणारी विस्तीर्ण जागा व भूभागावरील ही यात्रा असल्याने सतत 5 दिवस मनसोक्तपणे या यात्रेचा आनंद यात्रेकरुंना लुटता येतो हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तर अशा या यात्रेच्या गोड व सुखद स्मृती मनात पिंगा घालू लागल्या. त्यावेळी वयाने लहान असल्याने यात्रेच्या गर्दीत एकट्याने जाणे शक्य नसल्याने आई, वडिल, बहिण, मोठा भाऊ यांचा हात धरुनच आणि ते नेतील तेव्हाच. जत्रा पाहण्यासाठी जाता यायचे. तेव्हा मनात असून सुद्धा त्यांच्याशिवाय जत्रा पाहायला जाता येत नसे. पण त्यावेळी आधुनिकीकरण नसल्यामुळे व वीजही नसल्यामुळे पेट्रोमॅक्सचा जेवढा प्रकाश असेल त्या प्रकाशातच यात्रा पहावी लागत असे. पण या प्रकाशातही यात्रा पाहण्याचा व यात्रेत भटकणार्या वेगळा असा असायचा. वीज आल्यानंतर वीजेवर चालणारी आकाशपाळणे, टोराटोरा मुलांच्या खेळण्याच्या व पाहण्याच्या गोष्टी यात्रेत आल्या पण तत्पूर्वी लाकडी पाळणे चक्र, आणि मौतकाँ कुंआ या गोष्टी असायच्या. त्यावेळी अलिबाग शहरांतील यशवंत पाटील यांचा लाकडी पाळण्याचा व्यवसाय होता. लाकडी पाळण्याचे 2 यंत्र चक्र 2 व त्यात खालुबाज चक्र व पाळणे फिरविण्याकरीता मानवी शक्ती असायची. त्यावेळी या दोन्ही संचात बसण्यासाठी मुलांची खूप गर्दी व्हायची. हाताने पाळणे वर ढकलत असताना पाळण्यात बसलेले तरुण पाळणावरती जात. जमिनीवर रुमाल टाकायचे व पाळणा परत खाली आल्यावर तो रुमालने उचलायचे. या पाळणेवाल्यांच्या शेजारी फोटो काढण्याची दोन स्टुडिओ असायची. त्यावेळी यात्रेत फोटो काढणे एक नाविन्य असायचे. वीज नसल्याने दिवसाच्या प्रकाशातच फोटो काढले जायचे व फोटो काढण्यावर थोड्या वेळानंतर ते फोटो ज्याचे असतील त्यांना मिळायचे; त्यावेळी कृत्रिमरित्या तयार केलेल्या स्कूटर व बाईक (मोटारसायकल) वर बसून फोटो काढण्याची मोठी हौस असायची.
अगदी तत्कालिन परिस्थितीत मनोरंजनाची कोणतीच साधने उपलब्ध नसल्याने माहिती खात्यातर्फे दाखविलेले कृष्णधवल माहितीपट, मौतका कुँआ, पाळणे, जादूचे खेळ, विविध प्रकारचे खेळ, डान्सपार्टी तसेच जत्रेतील असणारा तमाशा अशीच मनोरंजनाची व विरंगुळ्याची साधने ही येथील भरणार्या विठोबा यात्रेतच असायची. त्यामुळे वर्षांनी येणारी ही यात्रा पुन्हा लवकर कधी येईल याचे वेध लागलेले असायचे. महत्त्वाचे म्हणजे बैलांनी रेटलेले उसाचे चरक, गरमागरम भजी, बटाटावडा व प्रामुख्याने मिठाई ही यात्रेतच मिळायची. त्यामुळे त्याच्यात एक नाविन्यपूर्ण गोडी असायची. मंदिर परिसरातील यात्रेसाठी राखून ठेवलेल्या जागेतच यात्रा भरायची, अलिबागकडून किंवा वरसोलीकडून यात्रा पाहण्यासाठी आलेले यात्रेकरु मंदिराच्या पश्चिमेकडील म्हणजे मंदिराच्या मागील बाजूने येऊन दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करायचे. या मागील बाजूसच भले मोठे असेच भजी, वडा, विविध पदार्थांचे हॉटेल असायचे. त्यामुळे जास्तीत जास्त उच्चभ्रू खवय्यांची गर्दी मोठ्या संख्येने या हॉटेलात असायची. त्याच्यापुढे मंदिराच्या कडेलाच हार, फुले, वेणींची दुकाने व त्याच्यासमोरील भागात काही उसाचे चरक व मिठाईच्या दुकानांची लाईन असायची. पूर्वाभिमुख असलेल्या विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला व दक्षिणेला एक-एक अशा दोन धर्मशाळा होत्या. त्यामधून काही कुटुंबे रहात असत. मंदिर आणि दक्षिणेकडील धर्मशाळेच्या गल्लीत कटलरी, गरम स्वेटर व इतर विविध प्रकारच्या तयार कपड्यांची दुकाने असायची. त्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी वेगळी मजा यायची. मंदिरासमोरुन (दीप माळेपासून) मोठी कटलरी, मिठाई, उसाचे चरक, हॉटेल आदी दुकाने असायची, तर त्याच्या पूर्वेकडील कुंपणालागून विविध प्रकारची भांडी विक्रीची दुकाने थाटलेली असायची. त्यामुळे चहूबाजूंनी यात्रा पाहण्याची व यात्रेत फिरण्याची व दररोज मनसोक्त यात्रेचा आनंद लुटता यायचा.
पटांगणाच्या पूर्वेकडील भागांतील शेतामध्ये यात्रेच्या पहिल्या दिवसापासून तमाशाचा तंबू असायचा, दिवसभराची यात्रेची धूम झाल्यावर रात्रीच्या वेळी चालू असणार्या तमाशामुळे यात्रेला एक वेगळ्या प्रकारचा रंग चढायचा. हा तमाशा रात्रौ 2 वाजेपर्यंत चालायचा. हा तमाशा म्हणजे लोकनाट्याचा प्रकार असल्याने सुरु झालेल्या लोकनाट्यात बतावणी, लावणी नृत्य व वग हा प्रकार असायचा. माझ्या अगदी लहानपणापासून या तमाशातील वगनाट्य मी पाहिलेले आहेत. सुरुवातीला लावणी म्हणण्यास सुरुवात झाल्यावर त्या पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या म्हटल्या जायच्या बतावणी व गण गौळण झाल्यावर वगाला सुरुवात व्हायची. यात सादर होणारे सर्व वग हे पौराणिक कथेवर आधारीत असल्याने रसिक प्रेक्षकांचे भरपूर प्रमाणात मनोरंजन व्हायचे. तमाशा पहायला रसिक प्रेक्षकांची दररोज मोठ्या संख्येने गर्दी व्हायची. पूर्वी अलिबागेत सिनेमागृह व नाट्यगृह नसल्याने यात्रेसाठी आलेला हा तमाशा मंडळ, महिनाभर येथेच तळ ठोकून असायचा. त्यावेळी सरस्वतीबाई कोल्हापूरकर या नावाने हा तमाशाचा फड असायचा. त्यावेळी सरस्वती बाईंच्या अभिनयाने, अदाकारीने व वगातील तारुण्यातील सरस्वतीबाईची भूमिका पाहण्यासाठी तमाशाला रोजच गर्दी व्हायची. खुल्या रंगमंचावर होणारा हा तमाशाचा कार्यक्रम त्यावेळी छप्पर म्हणून नव्यानेच तंबू आणल्याने बंदिस्त तंबूत पाहता येऊ लागला. त्यावेळी नवीन आणलेल्या तंबूचे उद्घाटन तत्कालिन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले होते. अलिकडे आधुनिकीकरणामुळे तमाशातील लावणी व हद्दपार झाली असून ऑर्केस्ट्रानी त्याची घेतली आहे. तसेच न्यायालयाच्या वेळेच्या बंधनामुळे व जागेअभावी तमाशा मंडळाचे येणे बंद झाले. परिणामी तमाशा अभावी जत्रेची रंगत व मजा गेली. एकूणच पूर्वी भरणारी जत्रा व आता भरणारी जत्रा यात फरक झाला असून पूर्वीची ती मजा आताच्या यात्रेतून बघायला मिळत नाही, अनुभवायला मिळत नाही, जत्रेचे स्वरुप पालटल्याने आठवणीत राहील अशी जत्रा पिढीला पहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. अशी ही हवीहवीशी वाटणारी विठोबाची जत्रा दरवर्षी असावी याची वाट आतुरतेने पाहणे एवढेच आपल्या प्रारब्धात असते.