भास्कर खंडागळे
शहरांच्या वाढीबरोबर प्रदूषणही वाढतं. गरिबांच्या वस्त्यांमध्ये प्रदूषणामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. वाढत्या औद्योगीकीकरणामुळे आणि आधुनिक जीवनशैलीमुळे संपूर्ण पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे. आज संपूर्ण पृथ्वीसाठी प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. लोकसंख्या जास्त असलेल्या आणि प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आर्थिक आणि सरकारी संसाधनं मर्यादित असलेल्या भागात परिस्थिती अधिक वाईट आहे.
जगातील सर्वच देश प्रदूषणाच्या समस्येशी झुंजत आहेत. मानवी व्यवहार आणि तांत्रिक उपकरणांच्या अतिवापरामुळे आजकाल हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. वातावरणातील सर्व प्रकारच्या वायूंचे प्रमाण ठरलेले असते; परंतु मानवाच्या हव्यासामुळे त्यांचे प्रमाण बदलते, तेव्हा वायू प्रदूषण होते. महानगरांमध्ये कारखाने आणि मोटारींच्या वाहनांचा धूर आणि हिवाळ्यात जाळण्यात येणार्या शेतीतील काडाच्या धुरामुळे वातावरण इतके दूषित होते की श्वास घेणेही कठीण होते. मनुष्य अनेक रोगांच्या विळख्यात सापडतो. दाट लोकसंख्येमध्ये ही समस्या अधिक गंभीर होत आहे. आधुनिक विकासाबरोबरच जलप्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळे शहरांमध्ये अनेक प्रकारचे उद्योग उभारले जात आहेत. घरे आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे दूषित पाणी, कचरा, रासायनिक कचरा यामुळे नद्या प्रदूषित होत असून अनेक आजार पसरत आहेत. घाण पाणी पिकांमध्ये शिरून तीही प्रदूषित होतात. या पिकांपासून तयार होणारे अन्न मानवी शरीरात जाते तेव्हा ते अनेक रोगांना जन्म देते. शुद्ध माती ही नैसर्गिक संपत्ती आहे, ती प्राणी आणि वनस्पतींच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते; परंतु मातीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी जास्त प्रमाणात कीटकनाशके आणि खतांचा वापर करतात. हे नैसर्गिक नाही आणि मातीच्या गुणवत्तेवर परिणाम करते. त्यातून जमिनीचे प्रदूषण वाढते. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’च्या ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ (एनपीएस) च्या अहवालानुसार, ध्वनी प्रदूषण आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी खूप हानीकारक आहे. त्यामुळे मानवालाच नव्हे, तर वन्यजीवांनाही गंभीर हानी होते.
ध्वनी प्रदूषण दीर्घकाळ राहिल्यास अनेक वृक्षांच्या प्रजाती नामशेष होऊ शकतात, असे अनेक संशोधकांचे मत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. कृत्रिम स्त्रोतांमुळे वातावरणातील प्रकाशाचे प्रमाण इतके जास्त होते की त्याचा निसर्गावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. त्याला प्रकाश प्रदूषण म्हणतात. प्रकाश प्रदूषणाचा केवळ मानवावरच नाही तर वनस्पती आणि प्राण्यांवरही विपरीत परिणाम होतो. ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय) हा मुख्यत्वे विशिष्ट क्षेत्रातील हवेची गुणवत्ता आणि वायू प्रदूषण मोजण्यासाठी वापरला जातो. यात आठ निर्देशक आहेत, ज्यात प्रामुख्याने पीएम 2.5 आणि पीएम 10 सारख्या निर्देशकांचा समावेश आहे. त्यात काही श्रेणी आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या क्षेत्राचा ‘एक्यूआय’ 0 ते 50 असेल तर त्याची हवेची गुणवत्ता खूप चांगली आहे असे मानले जाते. जर एखाद्या क्षेत्राचा ‘एक्यूआय’ 51-100 असेल तर तेथील हवेची गुणवत्ता समाधानकारक असते, ‘एक्यूआय’ 201-300 असेल तर हवेची गुणवत्ता खराब मानली जाते आणि 301-400 असेल तर हवा खूप खराब मानली जाते आणि ‘एक्यूआय’ 401-500 असलेल्या भागातले वायू प्रदूषण खूप गंभीर मानले जाते.
जगभरात दर वर्षी होणार्या सुमारे नऊ दशलक्ष मृत्यूंना प्रदूषण जबाबदार आहे. 2000 नंतर प्रदूषित हवेमुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे 55 टक्क्यांनी वाढले आहे. भारतात दर वर्षी सुमारे 24 लाख लोक आणि चीनमध्ये सुमारे 22 लाख लोक प्रदूषणामुळे अकाली मरण पावतात. या संशोधनात आढळून आले की, वर्षभरात जगभरात सिगारेट ओढणे आणि ‘पॅसिव्ह स्मोकिंग’मुळे अनेक मृत्यू होतात. वायू प्रदूषणामुळे लोक हृदयविकार, अर्धांगवायू, फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुसाचे इतर आजार आणि मधुमेहाचे बळी ठरतात. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने एक दशकापूर्वी अहवाल दिला होता की जीवाश्म इंधन जाळल्यामुळे निर्माण होणारे प्रदूषणाचे लहान कण हृदयरोग आणि मृत्यूसाठी जबाबदार आहेत. वायू प्रदूषण हे दक्षिण आशियातील अकाली मृत्यूंचे प्रमुख कारण आहे आणि या मृत्यूंची वाढती संख्या हे दर्शवते की विषारी उत्सर्जन वाढत आहे. जलप्रदूषणामुळे जगभरात दर वर्षी सुमारे 40 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांच्या वापरावर भर दिला पाहिजे. जेवढी वाहने रस्त्यावर धावतील तेवढे प्रदूषण वाढेल. वीजनिर्मितीसाठी जीवाश्म इंधनाचा वापर केला जात असल्यामुळे बाहेर पडणार्या धुरामुळे वातावरण दूषित होते. हे टाळण्यासाठी घरांमध्ये अधिकाधिक सौरऊर्जेचा वापर केला पाहिजे. इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेवर चालणार्या वाहनांचा वापर अधिकाधिक वाढवावा लागेल.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कमीत कमी वातानुकूलित उपकरणे वापरावीत, कारण त्यातून बाहेर पडणारा विषारी वायू वातावरण दूषित करतो तसेच ओझोनच्या थराला हानी पोहोचवतो. उद्योगांमधून बाहेर पडणार्या विषारी रासायनिक पदार्थांमुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होतेच; शिवाय त्यामध्ये राहणार्या जलचरांनाही हानी पोहोचते. त्यामुळे उद्योगांचे सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडू न देणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असावी. अर्धवट जळालेले मृतदेह, मृत प्राणी, कचरा, सेंद्रिय पदार्थ नद्यांमध्ये विसर्जित करण्यावर पूर्ण बंदी घालावी. खते आणि कीटकनाशकांचा वापर कमीत कमी ठेवावा, जेणेकरून पाण्याबरोबरच जमीनही प्रदूषणापासून वाचवता येईल. आपण निसर्गावर जितके प्रेम करू, तितकेच सुरक्षित राहू. केवळ रात्रीच्या वेळी सक्रिय असलेल्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींसाठी, प्रकाश प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांच्या पुनरुत्पादनात अडथळे येत आहेत. त्याचे झाडांवर आणि वनस्पतींवरही दुष्परिणाम होतात. मानवी डीएनएमध्ये एक विशिष्ट लय आहे, जी आपल्याला दिवसा प्रकाश आणि रात्री अंधाराची आवश्यकता असल्याचे निर्धारित करते. प्रकाश प्रदूषणामुळे नैसर्गिक सर्केडियन लय विस्कळीत होते, नंतर आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, नैराश्य, निद्रानाश इत्यादी रोग उद्भवतात.
पृथ्वीची परिसंस्था सूर्याच्या चक्रावर अवलंबून आहे आणि मानवनिर्मित प्रकाश प्रदूषणाचा परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे कृत्रिम प्रकाश स्रोतांचा अनावश्यक वापर टाळावा. प्रकाश स्रोत अशा प्रकारे ठेवले पाहिजेत की त्यांच्यापासून निघणारा प्रकाश विशिष्ट ठिकाणी केंद्रित होईल आणि आसपासच्या भागात पसरणार नाही. 2014 मध्ये वायुप्रदूषणाच्या जागतिक क्रमवारीत 28 व्या क्रमांकावर असलेला भारत 2019 मध्ये 23 व्या क्रमांकावर आला. आज पीएम 2.5 म्हणजे अडीच मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या धूलिकण प्रदूषणाच्या जागतिक क्रमवारीत बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत तिसर्या क्रमांकावर आहे. जगातील दहा सर्वात जास्त प्रदूषित शहरांपैकी सहा शहरे भारतात आहेत. त्यात दिल्ली तर आहेच पण अहमदाबादसुद्धा आहे. 2014 मध्ये प्रदूषणाच्या क्रमवारीत 51 व्या स्थानावर असलेली दिल्ली 2019 मध्ये तेराव्या स्थानावर आली; मात्र 2014 मध्ये चौदाव्या स्थानावर असलेले चीनमधले बीजिंग शहर आज 24 व्या स्थानावर आले आहे. याला कारण आहे चीन सरकारने केलेले व्यापक प्रयत्न. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार आज भारतात साडेबारा टक्के लोक प्रदूषणामुळे होणार्या रोगांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. भारतात मरण पावणार्या दर आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती वायू प्रदूषणाने मरते. या वायू प्रदूषणामुळे सर्वसाधारण भारतीय व्यक्तीचे आयुष्य पावणेदोन वर्षांनी घटत आहे.
असे असताना सरकारने वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण बांधकाम व्यवसायाला दिलेली खुली सूट हे या वायू प्रदूषणामागील एक मुख्य कारण आहे. एकूण वायू प्रदूषणातील कार्बनच्या उत्सर्जनात साधारणपणे 23 टक्के वाटा बांधकाम व्यवसायाचा असतो आणि असे असताना पूर्वी वीस हजार वर्ग मीटर क्षेत्रफळापेक्षा मोठ्या रहिवासी बांधकाम प्रकल्पाच्या पर्यावरणीय आघात मूल्यांकन अहवालाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची जी मंजुरी आवश्यक होती,
ती मर्यादा वाढवून पन्नास हजार वर्ग मीटर करण्यात आली. नंतर तर ती वाढवून दीड लाख वर्ग मीटर बांधकाम क्षेत्र करण्यात आली. या मर्यादेपर्यंत परवानग्या देण्याचे सगळे अधिकार महानगरपालिकांना देण्यात आले. वृक्ष कायद्यात बदल करून शहर आयुक्तांना झाडे तोडण्याचे थेट अधिकार देण्यात आल्याने मुंबई-ठाण्यासारख्या शहरातील झाडे हजारोंच्या संख्येने तुटत असताना ‘सीआरझेड’ कायद्यात 2018 मध्ये झालेल्या बदलांमुळे मिठागरे, कोळीवाडे थेट बिल्डरांच्या घशात जात आहेत. अशा वेळी शहरातील तलाव, खाड्यांसारख्या पाणथळ जागा आता कायद्याचा वापर करून नष्ट केल्या जात आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये शहरातील प्रदूषण नेमक्या कोणत्या उपायांनी कमी होईल, हा प्रश्न आता प्रत्येकानेच स्वतःला विचारायला हवा.