हेमंत देसाई
2022 मध्ये देशात 136 युनिकॉर्न कंपन्या होत्या. त्यापैकी केवळ पाच कंपन्या महिला उद्योजकांच्या होत्या. आपले कर्तृत्व लीलया सिध्द करणार्या या महिलांकडे उद्योगजगताचे पुरेसे लक्ष नाही. त्यांना वाढीसाठी उत्तम अवकाश निर्माण करुन देणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सरकारने तर यासंदर्भात आवर्जून काही पावले उचलली पाहिजेत. तसे मोठ्या प्रमाणावर व्हावे यासाठी नवउद्यमी महिलाशक्तीला पाठिंबा दिला पाहिजे.
भारतातल्या नवोद्योगांचे किंवा स्टार्ट अप्सचे बरेच गुणगान केले जात असले, तरी 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये या उद्योगाना 33 टक्के कमी भांडवल मिळाले. डॉलरच्या हिशेबात ही रक्कम 24 अब्ज इतकी होते. अर्थात तरीही 2019 आणि 2020 या वर्षांच्या तुलनेत नवोद्योगांना दुप्पट निधी मिळाला, हे वास्तव आहे. ‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या ताज्या अहवालानुसार, 2022 मध्ये अगदी पहिल्या टप्प्यात नवोद्योगांना मिळणार्या निधीत 12 टक्क्यांची वाढ झाली. याचा अर्थ भारतातल्या नवोद्योगांबाबत विशेष करून विदेशी गुंतवणूकदार अजूनही आशावादी आहेत. एखादा तंत्रज्ञानप्रधान नवोद्योग सुरू होण्याच्या अत्यंत प्राथमिक टप्प्यात असतो, तेव्हा त्याला निधीची खूप गरज असते. 2021 आणि 2022 मध्ये नवोद्योगांना जे एकूण भांडवल मिळाले, त्यापैकी 60 टक्के निधी हा प्राथमिक टप्प्यातच मिळाला, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक नवोद्योगास या टप्प्यात सरासरी 40 लाख डॉलर्स मिळाले. जगातील सर्वाधिक नवोद्योग हे अमेरिकेत आहेत. त्यानंतर चीनचा आणि त्यानंतर भारताचा नंबर लागतो. 2022 मध्ये भारतात 136 युनिकॉर्न कंपन्या होत्या. 100 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असणार्या कंपन्यांना युनिकॉर्न असे म्हणतात. दुसरी एक बाब म्हणजे या 136 युनिकॉर्न्समध्ये केवळ पाच कंपन्या महिला उद्योजकांच्या होत्या. आपले कर्तृत्व लीलया सिध्द करणार्या या महिलांकडे उद्योगजगताचे पुरेसे लक्ष नाही. त्यांना वाढीसाठी उत्तम अवकाश निर्माण करुन देणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सरकारने तर यासंदर्भात आवर्जून काही पावले उचलली पाहिजेत. दुर्दैवाने तसे आज मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. म्हणूनच या नवउद्यमी महिलाशक्तीला पाठिंबा दिला पाहिजे.
भारतात अजूनही खास करून उत्तर भारतात आणि अन्यत्रही काही जागी स्त्री-पुरुष असमानता आहे. भारताच्या जनगणना विभागाच्या 2013 ते 2017 मधील अंदाजानुसार, देशात महिलांचे सरासरी आयुष्य 70 वर्षे तर पुरुषांचे 67 वर्षे इतके आहे. दर वर्षी सरासरी एक लाख मुलांच्या जन्मामागे 130 महिलांचा मृत्यू होत असतो. अर्थात मुलगाच हवा, या धारणेतून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये देशात काहीसे कमी झाले आहे. आर्थिक बाबींचा विचार करताना सामाजिक बाबीही विचारात घ्याव्या लागतात. गर्भजल परीक्षणावर आणण्यात आलेली बंदी, बेटी बचाव हे अभियान आणि साक्षरतेत वाढ यामुळे लिंगगुणोत्तर सुधारले आहे. या पार्श्वभूमीवर, अजूनही महिला उद्योजकांची संख्या कमी असणे आणि युनिकॉर्न्समध्येही महिलांचा वाटा अत्यल्प असणे, हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी ‘बेटी पढाओ’च्या पलिकडे जाऊन विचार व्हायला हवा. म्हणूनच महिला उद्योजकतेचा आणि एकूणच महिलांमधील उद्यमशिलतेचा साकल्याने विचार व्हायला हवा. त्यांना कोणत्या प्रकारचे पाठबळ मिळाल्यास कर्तृत्व सिध्द करणे सोपे होईल, याचा अदमास घेऊन योजना आखल्या जायला हव्यात. या अनुषंगाने कल्पनांना पाठबळ मिळणे आणि चांगल्या संकल्पनांना पतपुरवठा होणे महत्वाचे आहे. यात किमान लिंगभेद तरी यायला नको. अनेक कर्तबगार महिलांनी या अनुषंगाने उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कर्तृत्वगाथा बोलक्या आहेत. त्यातून धडा घेण्याची आणि उद्यमशिलतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी काही कर्तृत्वशालिनींच्या यशोगाथा तपासून पहायला हव्यात.
सुमारे 45 वर्षांपूर्वी किरण मजुमदार-शॉ यांनी बंगळुरूमधील एका गॅरेजमध्ये ‘बायोकॉन’ या कंपनीची स्थापना केली. त्यांचे वडील रसेंद्र मजुमदार हे संयुक्त ब्रुवरीजचे मुख्य ब्रू-मास्टर होते. त्यांनीच किरण यांना आंबवणशास्त्र किंवा ब्रुइंगचे विज्ञान शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाठवले. 1974 मध्ये या कोर्ससाठी त्या एकमेव महिला विद्यार्थी होत्या. किरण यांनी आधी कार्लटन आणि युनायटेड ब्रुवरीजमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आणि नंतर भारतात येऊन काही खासगी कंपन्यांमध्ये अनुभव घेतला. परंतु त्यांनी बंगळुरू किंवा दिल्लीमध्ये कामाची संधी मिळते का हे पाहिले, तेव्हा महिला असल्यामुळे त्यांना कोणत्याही कंपनीत मास्टर-ब्रुअरर म्हणून काम मिळणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र हे एक आव्हान मानून किरण यांनी केवळ दहा हजार रुपये भांडवलावर भाड्याच्या गॅरेजमध्ये ‘बायोकॉन’ची स्थापना केली. कोणतीही बँक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हती. वैज्ञानिक कौशल्य असलेले कामगारही मिळत नव्हते. अशा अडचणींमधून किरण यांनी बायोकॉन ही एक महाकाय कंपनी बनवली आणि जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आज बायोकॉन ही कंपनी भारतात अग्रेसर असून जगातील सर्वात शक्तिशाली महिला उद्योजक म्हणून किरण यांचा ‘फोर्ब्स’ मासिकाकडून गौरव झाला आहे. इतक्या वर्षांनंतर आजही पहिल्या पिढीतील महिला उद्योजकांना व्यवसायाचे ज्ञान, कायदे आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोच.
सात वर्षांपूर्वी चेन्नई येथील हरिणी शिवकुमार यांचे वयाच्या बाविसाव्या वर्षी लग्न झाले. त्यांचा मुलगा ‘डाउन्स सिंड्रोम’ असलेला आहे. त्वचारोगही असल्यामुळे त्यांचा लहान मुलगा बाहेरचे साबण वापरू शकत नव्हता. अशा वेळी हरिणी यांनी घरच्या घरी साबण बनवायला सुरुवात केली आणि या साबणांना खूप मागणीही यायला लागली. हरिणी यांनी मग ‘अर्थ र्हिदम’ या नावाने स्टार्ट अपच सुरू केला. त्यांनी शेळीच्या दुधापासून बनवलेले साबण, बॉडी बटर लोशन्स आणि पुनर्वापर करता येऊ शकतील अशा मेक अप रिमूव्हर्सचे उत्पादन सुरू केले. आज या कंपनीची उलाढाल 200 कोटी रुपयांची असून ‘नायका’सारख्या कंपनीने त्यात गुंतवणूक केली आहे. उत्तराखंड येथील मीनाक्षी खाती यांचे वय अवघे 24 वर्षांचे आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी केवळ 50 हजार रुपयांच्या भाडवलावर ‘मीनाकृती’ ही कंपनी सुरू केली. ही कंपनी कोस्टर्स, कार्ड्स, पिशव्या आणि मुख्यतः उत्तराखंडमधील ‘ऐपण’ शैलीच्या चित्रांनी सजवलेल्या वस्तू विकते. कंपनीची वार्षिक उलाढाल 15 लाख रुपयांची आहे. वारली आणि मधुबनी चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच पद्धतीने उत्तराखंडमधील ऐपण या लोककलेचा प्रसार व्हावा, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
कीर्तिप्रिया या तीस वर्षांच्या स्त्रीने तेलंगणमधील थोंडा या दुर्गम भागातील खेड्यात ‘नर्चर फिल्ड्स इंडस्ट्रीज’ हा प्रकल्प स्थापन केला. ‘ओह फूड्स डॉट इन’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही कंपनी भाज्यांच्या निर्जलीकृत पावडर विकते. त्यांच्या प्रकल्पात बहुसंख्य महिला कर्मचारीच आहेत. ग्रामीण भागातही उत्तम व्यवसाय करून रोजगारनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. मुंबईतील श्वेता तिवारी या एका जाहिरात संस्थेत कलासंचालक म्हणून काम करत होत्या. त्यांनी 2014 मध्ये बिहारमधील गया या आपल्या मातृभूमीत ‘चुंगी स्टोअर डॉटकॉम’ ही कंपनी स्थापन केली. बंगाल आणि बिहारमधील कारागीर व विणकरांनी बनवलेल्या घरगुती शोभेच्या वस्तूंचे उत्पादन आणि विक्री हे या कंपनीचे ध्येय आहे. या कंपनीत 45 स्त्रिया काम करतात आणि कंपनी प्रगती पथावर आहे.
वरील काही उदाहरणे तपासून पाहिल्यास महिला उद्यमशिलतेला प्रोत्साहन आणि पूरक सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पाठबळ लाभल्यास काय होऊ शकते, हे पहायला मिळते. आजघडीला उद्योजक उत्तमोत्तम, नाविन्यपुर्ण संकल्पना घेऊन बाजारात येत आहेत. जीवनशैलीत घडून येणार्या वेगवान बदलामुळे या संकल्पनांना चांगला प्रतिसाद मिळणे अवघड नाही. हरिणी, शांतीप्रिया किंवा श्वेताच्या उदाहरणांवरुन हे सिध्द झाले आहे. गरज आहे ती इतर महिलांनी जोमाने पुढे येण्याची. दुसर्या बाजुने स्टार्ट अप्सना उदार होऊन सहकार्य करणार्या गुंतवणूकदारांची मदतरुपी गुंतवणूक या नवउद्यमशिलला लाभणेही महत्वाचे आहे. अनंत समस्यांचा मुकाबला करत भारतात महिलांचे नवोद्योग फोफावत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. यापुढील काळात त्यात भरीव वाढ होवो, हीच अपेक्षा आहे.