प्रा. अशोक ढगे
नागपूर विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत झालेला काँग्रेसचा पराभव, पुढे झालेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव, महाराष्ट्रात बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या दहा आमदारांची गैरहजेरी आणि सत्यजीत तांबे यांची बंडखोरी या सगळ्यासाठी जबाबदार असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची हकालपट्टी करण्याची मागणी करणारे पत्र आणि बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा काँग्रेसमधील ताज्या दुहीची साक्ष देते. नेमके काय घडतेय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये?
देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणार्या काँग्रेसला ‘भारत जोडो’ यात्रेने नवी उमेद आणि ताकद मिळाली आहे की नाही हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. रोड शो मध्ये झालेली गर्दी, हातात हात घालून केलेला प्रवास, मान्यवरांनी दिलेली पाऊलसाथ हे सगळे सत्तेच्या सारीपाटावर कसे सिद्ध होते हे आगामी काळ सांगेल. मात्र सध्या तरी या पक्षातील गटबाजी दूर होण्याची गरज असून ते या पक्षाबरोबरच देशासाठीही गरजेचे आहे. कारण सत्ता गेल्यानंतरही काँग्रेसमधील गटबाजी संपायला तयार नाही. सुमार लोकांच्या हाती सत्ता दिली आणि त्यांना दिल्लीकरांच्या एका गटाचा आशीर्वाद असला की काँग्रेसमधील निष्ठावंत आणि ‘मास बेस’ नेत्यांना ‘बुरे दिन’ येतात, हे काही आजचे वास्तव नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या ‘मास बेस’ नेत्यांनी हीच स्थिती अनुभवली आहे. त्या वेळी किमान काँग्रेस सत्तेत तरी होती, पण आता तेही राहिले नाही. असे असूनही दरबारी राजकारण करणार्यांना काँग्रेसमध्ये अवास्तव महत्त्व दिले जात आहे.
अलिकडेच आमदार आशिष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेल्या पत्रात पटोले यांच्या नापाक कारवायांचा पाढाच वाचला होता. प्रदेशाध्यक्ष असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसला सत्तेत आणले. काँग्रेसची वाताहात थांबली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत यश मिळवून दिले. उलट, पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले आणि काँग्रेसची सत्ताही गेली. त्यांच्या काळात काँग्रेसमधील गटबाजी वाढली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. पटोले यांचा तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यांशी संघर्ष झाला. नागपूरमध्ये अडबाले यांना उमेदवारी देण्यासही त्यांचा विरोध होता. मात्र सुनील केदार आणि अन्य नेत्यांपुढे त्यांचे चालले नाही. केदार यांनी नागपूरच्या संघभूमीत पंजा फुलवला. बाळासाहेब थोरात हे अतिशय संयमी आणि निष्ठावान नेते आहेत. शरद पवार यांच्यांशी चांगले संबंध असूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नाहीत. थोरात यांचे अनेक नातलग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी पक्षनिष्ठेशी कधीच तडजोड केली नाही. पुढे नातेवाईक मंडळी भाजप आणि शिवसेनेत गेल्यानंतरही थोरात यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला कधीच ढासळू दिला नाही. असे असताना पटोले यांनी मात्र थोरात यांच्या पक्षनिष्ठेवरच शंका घेतली.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून पटोले यांनी घोळ घातला आणि थोरात यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून काँग्रेसमध्ये द्वंद्व सुरू झाले. पटोले यांच्या पदावरच गडांतर येण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे एरवी अतिशय संयमी आणि राहुल तसेच सोनिया गांधी यांच्याशी चांगले संबंध असणार्या थोरातांनी थेट पटोले यांच्याबरोबर काम करणे शक्य नसल्याचे सांगत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यावरून हे गंभीर मतभेदाचे भांडण असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळात परंपरागत राजकीय शत्रू राधाकृष्ण विखे पाटील हे थोरात यांना उचकवण्याचा प्रयत्न करत होते. तसाच प्रयत्न पटोलेही करत होते. जिल्हा काँग्रेसवर थोरात यांचे वर्चस्व असून त्यांनी नेमलेली कार्यकारिणी बरखास्त करण्यापर्यंत पटोले यांची मजल गेली. आता थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून अशा प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीवरून घोळ कसा आणि कोणामुळे झाला, हे समोर आले होते. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस एच. के. पाटील यांनी तांबे कुटुंबातील कोणी निवडणूक लढवायची याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे सांगितले होते. त्यानंतर ही जागा सत्यजीत यांनी लढवावी, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
या वळणावर सत्यजीत यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाऐवजी औरंगाबाद आणि नागपूर मतदारसंघांचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांचे नाव लिहूनच पुन्हा फॉर्म दिले गेल्याचे सत्यजीत यांनी पुराव्यांसह निदर्शनास आणल्यामुळे पटोले यांची मोठी पंचाईत झाली. यानंतर पटोले यांनी आपले विश्वासू सहकारी तसेच पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आपली बाजू सांभाळणारे उत्तर द्यायला सांगितले होते. थोरात यांचे प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर पटोलेंनी याच लोंढे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती. श्री. थोरात यांनी सचिन सावंत यांना प्रवक्तेपद दिले होते. ते काँग्रेसची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडत होते. नव्या अध्यक्षाला त्याची कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार असला तरी त्यांनी जुन्या नेत्याच्या सर्व समर्थकांना घरी बसवावे, असा अर्थ होत नाही. मात्र असे झाले. थोरात याबाबत प्रसारमाध्यमांशी काहीही बोलले नसले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून सध्याच्या प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यांनी पक्षातल्या पदाचा राजीनामाही दिला. काँग्रेसमध्ये इतकी वर्षे आपण निष्ठेने काय काय काम केले, याचीही जाणीव या पत्राद्वारे करुन देण्यात आली आहे. पटोले यांचे गॉडफादर के. सी. वेणुगोपाल असून त्यांच्यामुळेच राजस्थानचा पेच चिघळल्याचे लक्षात घेतले की ते काँग्रेस वाचवायला निघाले आहेत की भाजपचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावत आहेत, असा प्रश्न पडतो.
राज्यात अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दोन महत्त्वाचे चेहरे आहेत. असे असूनही पक्षाची अवस्था फारशी चांगली नसताना थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दुखावणे योग्य नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर सुरू झालेली नाना पटोले यांची मनमानी संपलेली नाही. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छोटू भोयर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. आयत्या वेळी ते पळून गेले. भोयर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पक्षश्रेष्ठींनी देऊनही पटोले यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले नव्हते. श्री. पटोले पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना नाराज करून काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याच्या भ्रमात असले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी हे कसे चालवून घेतात, हा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांपुढील मोठा प्रश्न आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक हे तांबे परिवार आणि थोरात यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. ही स्क्रिप्टेड स्टोरी असल्याच्या तांबे यांच्या आरोपावर स्वतः उत्तर देण्याऐवजी पटोले यांनी लोंढे यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. लोंढे यांच्या स्पष्टीकरणानंतर थोरात यांचे पत्र पुढे आल्याने काँग्रेसमधील कलह वाढला असून आता पटोले यांच्याबाबत काय भूमिका घ्यावी, असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर आहे. इतरांच्या निष्ठेविषयी बोलणार्या पटोले यांनीच काँग्रेस-भाजप- काँग्रेस असा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठेविषयी बोलू नये, असे काँग्रेसजनांचे मत आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गरळ ओकल्याने काँग्रेस वाढणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
आमदार तांबे यांच्या आरोपांनंतर काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही भूमिका मांडली. त्यांनी सत्यजीत यांचे समर्थन केले. सत्यजीत तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची दखल घ्यावीच लागणार. पक्षाला आता कुठे चांगले दिवस येत आहेत. त्यात हे काय चालले आहे, याचा खुलासा प्रदेश कार्यकरिणीने केला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राऊत, केदार, वड्डेट्टीवार, आ. आशिष देशमुख यांच्या तक्रारी पाहता काँग्रेसला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या ठिकाणांहूनच प्रदेशाध्यक्षांविरोधात गंभीर तक्रारी येतात. निश्चितच हे चांगले लक्षण नाही. श्री. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला अपेक्षित पध्दतीने संघटित करू शकले नाहीत. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वडेट्टीवर आदी नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येते. नागपूर विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत झालेला काँग्रेसचा पराभव, पुढच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांची झालेली धक्कादायक हार, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या दहा आमदारांची गैरहजेरी आणि सत्यजीत यांची बंडखोरी या सगळ्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोलेच जबाबदार असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पक्षांतर्गत दुहीची साक्ष देते. या वादळात आता कोणाचा बळी जातो, हे बघायचे.