दीपक पवार
व र्ष होते 2006-07. साथी संजय संगवई यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आटपाडी’ तालुक्याच्या पाणीप्रश्नाची सद्यःस्थिती आणि पर्यायी दिशा या विषयावर अभ्यास करण्यासाठी अभ्यासवृत्ती (फेलोशिप) मिळाली होती. आटपाडी तालुक्याला खेटून असणारा सांगोला तालुका. 13 दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळावे, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली 26 जुलैला आटपाडीच्या भवानी विद्यालयाच्या मैदानावर पाणी परिषदेचे आयोजन करण्यात येत असत. गणपतराव देशमुखांनी प्रश्नांवर विधिमंडळाच्या अधिवेशनात सतत आवाज उठवला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या अन्य लोकांना याविषयावर बोलत करावं, यासाठी सांगोला महाविद्यालयाच्या वसतिगृहात चार दिवस वस्तीला होता.
उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी तिन्हीसांजेला प्रा. चंद्रशेखर पवार, प्रा. दत्ता घोलप आम्ही तिघं गणपतराव आबांच्या रेल्वे फाटकापासून अर्धा कि.मी. अंतरावर असणार्या आबासाहेबांच्या घरी मुलाखत घेण्याच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. मावळतीच्या बाजूला तोंड असणार्या बंगलावजा घरात गेला. प्रवेश करताच क्षणी साधी राहणी असल्याचं लक्षात आलं. घरात साधी फरशी. येणार्या लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या साध्या खुर्च्या. लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला लँडलाईन फोन. त्यांच्या शेजारी आबासाहेबांना बसण्यासाठी असलेली खुर्ची. त्याच्या शेजारी स्वीय सहाय्यकाची खुर्ची. एकदम साधी राहणी. अंगात पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, उंची सहा फुटांच्या आसपास. डोक्यावर पांढरे फडफडीत झालेले केस. मिशा काढलेल्या, असं साधं व्यक्तिमत्त्व असलेल्या आबासाहेबांचं झालेले पहिलं दर्शन. आमची ओळख करून देत असतानाच ते म्हणाले, जरा मोठ्याने बोला. बहुधा ऐकायला कमी येत असावं. हे लक्षात आलं आमच्या. चंद्रशेखर पवारांनी बोलायला सुरुवात केली. आम्ही तिघांनी विचारलेल्या प्रश्नाला आबासाहेबांनी समर्पक उत्तरे दिली. पाणी परिषदेची निर्मिती, दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीचे पाणी, रोजगारनिर्मिती यासह विविध प्रश्नांवर आस्थेने बोलले. खरं तर, आबासाहेबांची मुलाखत घेताना माझ्यावर एकप्रकारे दडपण होतं, पण ते दूर झाले. गणपतराव देशमुखांनी आपल्या पन्नास वर्षांच्या आमदारकीच्या प्रदीर्घ कालखंडात सांगोल्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. सूतगिरणी, पतसंस्था, बँका अशा सहकारी संस्थांचे जाळे विणले. त्यातून असंख्य लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अकरा वेळा, एकाच पक्षाच्या झेंड्याखाली निवडून येणारे गणपतराव देशमुख बहुधा एकमेव आमदार असावेत. ते शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले. कधीही प्रतारणा केली नाही.
गणपतराव वकिली व्यवसाय सोडून सामान्यांच्या प्रश्नांंसाठी राजकारणात आले. 1962 ला पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. 1972 व 1995 चा अपवाद वगळता विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले. अकरा वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये आबांच्या कारकीर्दीची नोंद झाली आहे. विधानसभेची 2019 ची निवडणूक त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे लढविली नव्हती. विद्याथीर्र्दशेपासून ते विविध आंदोलनात सक्रिय होते. 1990 ते 2004 ते 2009 साली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आबांना महाराष्ट्र विधिमंडळाचा जीवनगौरव पुरस्कार, वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब पाटील समाज भूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार, भारती विद्यापीठ पुणेचा जीवन साधना गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळात 55 वर्षे कारकीर्दीबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा 2017 मध्ये सन्मान झाला आहे.
जनसामान्यांत हळहळ आबांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरली. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात निधनाच्या वृत्ताने नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. ‘आपल्यातील, आपला माणूस हरपला’ अशी भावना सामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यात झाली होती. आयुष्यभर त्यांनी आपला वेळ, आपली राजकीय ताकद जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालविली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानंतर सांगोल्यातील अनेक ठिकाणी अभिषेक व प्रार्थना करण्यात येत होत्या. चळवळीतील आमदार म्हणूनही ओळख
आयुष्यभर आबासाहेब दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे यासाठी आयुष्यभर संघर्ष करीत राहिले. तत्त्वनिष्ठ राजकारणामुळे त्यांनी शेकाप पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विचार केला नाही. त्यामुळे नेहमी विरोधी बाकावर असणारे गणपतराव देशमुखांनी तालुक्याच्या टेंभू, म्हैसाळ, नीरा-उजवा इत्यादी पाणी योजनांचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी शेवटपर्यंत पाणी परिषदा, पाण्यासाठीचे आंदोलने, मेळावे करीत राहिले. तालुक्याला पाणी मिळावे यासाठी आयुष्यभर झटणारे आबासाहेब चळवळीतील खरे ‘पाणीदार आमदार’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले. जनसामान्यांसाठी विविध वेळेला केलेल्या आंदोलनामुळे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. प्रत्येक कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा सर्वसामान्यांंसाठी आयुष्यभर झगडणारे गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आबासाहेबांचा ‘खानापूर’ शी जिव्हाळ्याचा संबंध :
क्रांतीसिंह नाना पाटील खासदार असल्यापासून गणपतरावांचा खानापूर तालुक्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, हे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. आटपाडी व सांगोला तालुक्याच्या सीमेवर असणार्या तलावा पाणीप्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळेपासून आबांचे तालुक्याशी संबंध होते. 1993 साली क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली पाणी परिषद झाली. ती संघटित करण्यात आबांचा सक्रिय सहभाग होता. सातत्याने पाणी परिषदेच्या आंदोलनात अखेरच्या श्वासापर्यंत सोबत होते. 2001 ला पाणी परिषद आयोजित केली होती. त्यास एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. 2003 साली विट्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने गणपतराव देशमुखांना नागनाथअण्णांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याच दरम्यान, क्रांतिवीरागंणा हौसाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपतराव पवार यांनी स्वत:ची जनावरे तहसीलदार कचेरीच्या आवारात तब्बल 103 दिवस बांधली. त्यावेळी गणपतराव आबांनी आंदोलनास पाठिंबा दिला. माजी आमदार भाई भगवानराव (बप्पा) पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रम उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. एकंदरीत, आबांचा दुष्काळी खानापूर तालुक्याशी जिव्हाळ्याचे संबंध कायमचे होते.