नव्या जाणिवांनिशी सहर्ष स्वागत!

उर्मिला राजोपाध्ये

गेल्या दिवाळीनंतर कोरोनाने निराशेचं मळभ अधिकच गहिरं केलं आणि दुसर्‍या लाटेचा विळखा कमालीचा आवळला. मागच्या अनेक पुढ्यांनी अनुभवला नसेल इतका आर्थिक, भावनिक प्रलय घराघरानं झेलला आहे. म्हणूनच मनामनातल्या जखमा भळभळत्या असताना, गमावलेल्या आप्तेष्टांच्या आठवणींचे लोट आटलेले नसताना, हसर्‍या घरांच्या भिंती अचानक आलेल्या मुकेपणाला सरावलेल्या नसताना सामोरं आलेलं हे प्रकाशपर्व नेहमीपेक्षा अधिक संयमानं साजरं करण्याची गरज आहे.
मागील दिवाळी तणावग्रस्त अवस्थेत साजरी करताना प्रत्येकाच्या मनात आशेच्या दीपमाळा फुलल्या होत्या. नवीन संवत्सरात तरी कोरोना नामक आगंतुकाचा विळखा सैलावेल आणि जीवनचक्र मुळपदावर येईल, अशी आशा प्रत्येकाच्याच मनात होती. मात्र दिवाळीनंतरच्या पर्वानं तर निराशेचं मळभ अधिकच गहिरं केलं आणि दुसर्‍या लाटेचा विळखा कमालीचा आवळला. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या काळानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मागच्या अनेक पुढ्यांनी अनुभवला नसेल इतका आर्थिक, भावनिक प्रलय घराघरानं बघितला आणि झेलला आहे. म्हणूनच मनामनातल्या जखमा भळभळत्या असताना, गमावलेल्या आप्तेष्टांच्या आठवणींचे लोट आटलेले नसताना, हसर्‍या घरांच्या भिंती अचानक आलेल्या मुकेपणाला सरावलेल्या नसताना सामोरंं आलेलं हे प्रकाशपर्व नेहमीपेक्षा अधिक संयमानं, शहाणपणानं आणि संवेदनशीलतेनं साजरं करण्याची गरज आहे.
राव-रंकांच्या अंगणांमध्ये प्रकाशाची फुलझाडं फुलवते ती दिवाळी, आबालवृद्धांच्या आकांक्षांवर तृप्तीची फुंकर घालते ती दिवाळी… हा वर्षभरातला सर्वाधिक बहुप्रतिक्षित सण. नानाविध पुराणकथांनी समृद्ध केलेलं आणि पिढ्यानपिढ्यांनी साजरीकरणातून पोषित केलेलं हे आनंदपर्व आधुनिक काळाच्या चंगळवादी संस्कृतीत तर आणखी जोमानं बहरलं. अर्थातच हा बहर वाढत्या बाजारमहात्म्यामुळे होता तसाच साहित्य-कला-परंपरा-संस्कृतीविषयक रुंदावलेल्या जाणीवांचाही परिपाक होता. वाढत्या स्पर्धेमुळे जगण्यातली व्यस्तता आणि व्याप वाढत असताना क्षणोक्षणी विखरणारे सुखाचे क्षण गोळा करण्याची ती एक सुवर्णसंधी होती. केवळ फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांमध्ये अडकणार्‍या अलिकडच्या समाजाला रूब-रू होण्याची संधी दिली ती अलिकडच्या दीपावलीने. म्हणजेच एकीकडे दिवाळीचं पुर्वीचं साधं पण राजस रुप अलिकडे पालटलेलं दिसलं असलं तरी सणाचं हे बदलतं रुपही कौतुकानं पहावं आणि आनंदानं अनुभवावं असंच होतं. प्रत्येक दिवाळी दिसामासानं मोठ्या होणार्‍या घरातल्या युवापिढीसाठी अनुभूतीचंं एक दालन उघडून जात असते. साजर्‍या केलेल्या प्रत्येक दिवाळीचा एक साज त्याच्या स्मृतींच्या कोंदणात जडत जातो आणि आठवणींचा हा लखलखता हार पुढे बहुमुल्य ठेवा ठरतो. म्हणूनच दर वर्षी दिवाळी साजरी होत असली तरी प्रत्येक वर्षी तिचे संदर्भ वेगळे असतात. तिच्याशी संबंधित आठवणींचे धागे वेगळे असतात.
यंदा पाठीला पाठ लावून आलेल्या आपत्तींनी समाजाला इतकं झोडपून काढलं आहे की ‘महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे वाचती’ असं म्हणण्याचीही सोय राहिलेली नाही कारण लव्हाळासारखं आयुष्य कंठणार्‍या अनेक निरागस, निष्पाप, शालीन जीवांनाही या काळाने आपल्या उदरात सामावून घेतलं आहे. कोरोना, त्यानंतरच्या जीवघेण्या बुरशीची दहशत, विध्वंसक चक्रीवादळं, जणू परिसराचा घोट घेईल की काय अशी भीती उत्पन्न करणारी अतिवृष्टी या सर्वात रसातळाला गेलेली अर्थस्थिती, ठप्प झालेलं अर्थचक्र आणि सैरभैर झालेली मनोवस्था… एखाद्या दैत्यानं संपूर्ण सृष्टी वेठीस धरावी आणि हतबलतेनं त्याला शरण जाण्याखेरीज जनलोकांपुढे मार्ग राहू नये अशी पुराणकथांमधून कानी पडणारी स्थिती गतकाळात आपल्यातल्या प्रत्येकाने अनुभवली. या काळात दहशत, नैराश्य, भीती, अगतिकता, क्षणभंगूरता आदी परिचित शब्दांचा अर्थ खर्‍या अर्थानं समजला. या काळात अकाली झालेली अपरिमीतपानगळ प्रत्येकाच्या मनातल्या जीवनेच्छेला दणदणीत तडाखा देऊन गेली. आता कुठे आपण या सगळ्यातून बाहेर येत आहोत. संहारानंतरच्या दुरावस्थेचं मोजमाप करत आहोत. आठवणींचे अनिवार उमाळे सहन करत नव्याने जगण्याचा प्रयत्न करत आहोत. मनस्थितीपासून अर्थव्यवस्थेपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झालं असताना, त्यातून सावरत जमेल तसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. शेवटी म्हणतात तसं जग नेहमीच जित्यांचं असतं. त्यानुसार जीव वाचलेला प्रत्येकजण आता जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहतो आहे. उमगलेल्या नव्या जाणीवेनिशी जगण्याला सामोरा जात आहे. पुढे सरसावणारी प्रकाशवाट त्या प्रत्येक पांथस्थासाठी महत्त्वाची आहे.
या दिवाळीत भावना आणि संवेदनांच्या पातळीवर आपण सर्वांनी अनेक योजनं पुढे जाण्याची नितांत आवश्यकता आहे. आत्तापर्यंत हा उत्सव घरातला होता, मात्र आता तो संपूर्ण समाजाचा व्हायला हवा. कारण मधल्या काळानं ही सीमारेषा बर्‍याच अंशी पुसट केली आहे. आपल्या अडचणीच्या काळात दाराला डबा लावून जाणारे आपल्या रक्ताचे नव्हते, सगळे कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना न सांगता आर्थिक भार हलका करणारे सगळेच आपल्या नात्याचे नव्हते, घराघरावर यमदुताचा कडा पहारा असताना, एका वेळी अनेक सरणं धगधगत असताना गेलेल्या प्रत्येक जीवाची व्यवस्था करणारे आणि उरलेल्या प्रत्येक जीवाची आस्थेनं विचारपूस करणारे सगळेच आपल्या ओळखीचे नव्हते. त्या कसोटीच्या काळात अनेक अपरिचितांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन कठीण काम केलं. आरोग्यालयं ओसंडून वाहत असताना वैद्यकीय क्षेत्रातले लोक देवासारखे धावून आले. तासांची गणती न करता अविरत काम करुन त्यांनी अनेकांना जीवनदान दिलं. अशा देवदुतांमुळेच आज अनेकजण हे प्रकाशपर्व पाहू शकत आहेत, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळेच या निमित्ताने या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे आणि हे कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्यांची आठवण ठेवून त्यांना आदरांजली वाहणं ही माणुसकी आहे. याची जाण प्रत्येकानं ठेवायला हवी.
ही दिवाळी आपल्या घरात साजरी करावी तसंच त्या अनाथांबरोबर साजरी करावी ज्या लहानग्यांनी आपले पालक गमावले आहेत. त्यांच्याबरोबर साजरी करावी ज्या म्हातार्‍या खोडांदेखत घरातले बहरते वृक्ष कोसळले आहेत. खरं तर मुकपणे आवंढे गिळणार्‍या प्रत्येकासोबत साजरी करायला हवी अशी ही दिवाळी आहे. फराळात एखादा जिन्नस करण्यासाठी वेळ कमी पडला तरी चालेल पण अशांबरोबर वेळ घालवावा, जे एकटेपणाच्या पिंजर्‍यात अडकून पडले आहेत. तब्बल दीड-दोन वर्ष सक्तीच्या बंदिवासात राहिल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला अन्नाची, कपड्यालत्त्याची, चैनीची नेमकी गरज आणि त्याची खरी किंमत समजली आहे. म्हणूनच ही दिवाळी आभासातून वास्तवात येण्याचा एक साकव आहे असंही आपण म्हणू शकतो. हा प्रकाशधागा जुळलेले ऋणानुबंध घट्ट करण्यासाठी वापरायला हवा. दिवाळीची पहाट आपल्याबरोबरच गरजूंच्या जगण्यात नव्या प्रकाशकिरणांची रुजवात करणारी असायला हवी. यंदाही अभ्यंगस्नान होईल, पण त्यामुळे आलेली शुचिर्भूत अवस्था आता तनाबरोबरच आपल्या मनापर्यंत पोहोचायला हवी. मनात साठलेलं किल्मिश दूर करुन तेजोनिधीला अवताण देण्याची ही संधी कोणीही सोडू नये अशीच आहे. या नव्या अर्थानिशी जगण्याची सुरूवात करण्याचा, नव्या जाणीवांनिशी श्रीगणेशा करण्याचा दिवाळीखेरीज अन्य कोणता सुमंगल मुहूर्त असू शकतो? निश्‍चितच जगणं आनंददायी आहे, आश्‍वासक आहे. म्हणूनच त्याचा सन्मान करु या. सर्व कलांचा मनमुराद आस्वाद घेऊ या. उत्तम वाचू या, उत्तम ऐकू या. जीवन समृद्ध बनवणं हे केवळ आणि केवळ आपल्या हाती आहे हे समजून घेऊन समृद्धीच्या दिशेने दमदार पावलं टाकू या. दीपावलीचं सहर्ष स्वागत करू या.

Exit mobile version