। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांचा चारा घोटाळा हा सर्वज्ञात आहे. लालूंवरील पाचव्या चारा घोटाळा प्रकरणात दोरांडा कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणात लालूंना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा विशेष सीबीआय कोर्टाकडून सुनावली आहे. त्याचबरोबर 60 लाखांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी लालूंसोबतच्या 75 आरोपींना 15 फेब्रुवारी रोजी कोर्टाने दोषी ठरवले होते. तर इतर 24 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. यांमध्ये 36 जणांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर दोषींना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात येत आहे.
या घोटाळ्यात अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. हे प्रकरण सन 1990-92 च्या दरम्यान घडले. या घोटाळ्यातील अधिकारी आणि नेत्यांच्या फसवणुकीची नवी मालिकाच समोर आली आहे. यामध्ये 400 रेड्यांना हरयाणा आणि दिल्लीहून स्कूटर आणि मोटरसायकलवरुन रांचीपर्यंत आणण्यात आले होते. म्हणजेच त्यांच्या वाहतुकीसाठी ज्या वाहनांचे नंबर दाखवण्यात आले होते ते स्कूटर आणि मोटरसायकलचे नंबर देण्यात आले होते. अशा प्रकारे खोटी माहिती नोंदवण्यात आली होती.’
सीबीयाच्या चौकशीत हे देखील उघड झाले की, अनेक टन पशूखाद्य, मका, बदाम, मीठ याच्या वाहतुकीसाठी स्कूटर, मोटरसायकरचे नंबरही देण्यात आले होते. सीबीआयच्या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर कट-कारस्थान रचलं गेलं होतं. यामध्ये राज्यातील नेते, कर्मचारी आणि व्यापार्यांचा सहभाग होता. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्र यांच्यासह अनेक राज्यमंत्र्यांना अटक झाली होती.