। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशात 5G सेवा सुरु होत असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 5G इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली. सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5जी इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
देशातील 5G सुविधेसाठी सुरुवातीच्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश
देशातील ज्या 13 शहरांची निवड सुरुवातीला 5G सुविधेसाठी करण्यात आली आहे त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. पुण्यातील सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, डाटा ऑपरेटर्स, आय. टी. इंजिनियर्स, इंडस्ट्रलिस्ट आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अशा सर्वांकडून या 5G इंटरनेट सेवेचं स्वागत करण्यात येत आहे.
अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा
तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. तसेच भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.