| मुंबई | प्रतिनिधी |
विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत शनिवारी भाजपच्या पाच, शिवसेना शिंदे गटाच्या दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा निवडणूक अर्ज वैध ठरला. तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून विजयी उमेदवारांची घोषणा सोमवारी (दि.4) करण्यात येईल.
विधान परिषद निवडणुकीच्या 9 जागांसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय पक्षांच्या चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले होते. याशिवाय चार जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. या उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. छाननीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्याने अवैध ठरले.
विधान परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरला आहे. या पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. या अर्जावर सूचक आणि अनुमोदकाच्या सह्या नसल्याने तो बाद ठरला. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 मे अशी आहे. ही मुदत संपल्यानंतर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा
केली जाईल.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
भाजप :सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार
शिवसेना शिंदे गट : डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू
राष्ट्रवादी अजित पवार गट : झिशान सिद्दिकी
शिवसेना ठाकरे गट : अंबादास दानवे






