| अलिबाग । वार्ताहर ।
‘जल है तो कल है’ या उक्तीतच पाण्याचे महत्व स्पष्ट होते. सुप्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगूळकर यांनीही त्यांच्या ‘संथ वाहते कृष्णामाई..’ या गीताद्वारे पाण्याचे महत्व विषद केले आहे. त्यामुळे आपल्या व आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी कटिबद्ध होवू या, प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य तितके योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला हा उपक्रम जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविला जात आहे. याबाबतची कार्यशाळा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, जलसंपदा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार विशाल दौंडकर, नदी संवाद यात्री किशोर धारिया, रवींद्र पाटील, अरविंद म्हात्रे, उदय मानकवळे, चंद्रकांत उत्तेकर, सर्व तहसिलदार व विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नदी संवाद यात्री उदय मानकवळे, अरविंद म्हात्रे, रवींद्र पाटील या सर्वांनी रायगड जिल्ह्यातील भोगावती, सावित्री, काळ व कासाडी या नद्यांची सद्य:स्थिती, त्यांच्या समस्या तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने जलसंपदा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, नद्या, धरणे व जलस्रोतांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमात प्रशासनाने दिलेल्या योगदानाबद्दल आपले मनोगत मांडले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले तर आभार सहाय्यक उपवनसंरक्षक संजय कदम यांनी व्यक्त केले.
सजीवांसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दोन टक्के पाणी पिण्यायोग्य असून त्याचे संवर्धन करणे सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे. जलसाक्षरता, जलसंवर्धन क्षेत्रात नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांचे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून व आमिर खान यांचे पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे योगदान आहे. या क्षेत्रातील त्यांचे काम आपल्या सर्वांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
अमोल यादव
अपर जिल्हाधिकारी