। पाली । प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळात जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले. पाली येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पटेल यांनी यावेळी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. तसेच वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपा पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली.
आम्ही भारत मातेच्या सेवेसाठी आहोत. गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे हित जपणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गरीब कल्याण अनाज योजनेच्या माध्यमातून 80 कोटी नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. राजकारण केवळ मतांसाठी नसतं जिथं जन्माला आलोय त्या गावाचा, तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जावा, यासाठी काम केलं पाहिजे, असे केंद्रीय मंत्री पटेल म्हणाले.
या दौर्यात रायगड लोकसभा प्रवास योजना या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, किसान विमा योजना आदी अनेक योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बंधू भगिनी, व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणीबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच काही तक्रारी, काही शंका असल्यास त्याचे निवारण देखील केले. यावेळी भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
देशाची लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा याचा विचार करता पाण्याचा विशेषतः सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे हीच खरी काळाची गरज आहे. या योजनेच्या माध्यमातून केवळ पाणी पुरवठा करण्यात येणार नसून पाण्याचे उपलब्ध स्रोत 30 वर्ष टिकून राहावेत, यासाठी अत्यंत सुष्म पद्धतीने नियोजन केले जाणार आहेत.
प्रल्हादसिंग पटेल,केंद्रीय मंत्री
मंत्र्यांचा सत्कार
रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पाली-सुधागड गावाला धावती भेट देत युवा कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तसेच मनोभावे पूजा केली. यावेळी प्रल्हादसिंह पटेल यांचा बल्लाळेश्वर गणपती मंदिर समितीतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.