| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील शेतकर्यांच्या शेतात साठून राहिलेल्या पाण्याबद्दल तहसिलदार विक्रम देशमुख यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. जमीन खरेदी करणार्या व्यक्तींकडून त्या भागात मातीचा भराव केल्याने नैसर्गिक पाणी वाहून जाणारा मार्ग बंद केल्याने परिसरातील शेतकर्यांच्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिले आहे. त्या पाण्यामुळे येथील पाच शेतकर्यांच्या जमिनीतील भाताच्या रोपांचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल तहसीलदार यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी शेतकर्यांच्या तक्रारीची माहिती घेतली आहे.
कडाव परिसरात काही फार्महाऊस मालकांनी पाण्याच्या नैसर्गिक मार्गावर मातीचे भराव आणि बांधकाम करून अडथळा निर्माण केले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकर्यांच्या शेतात साचल्याने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे परिसरातील अनेक शेतकर्यांना आपली भात शेती धोक्यात आली आहे. पावसाळी हंगामात शेतात अती प्रमाणात पाणी साचल्याने शेतकर्यांना भाताचे राब पेरता आले नाही,तसेच ज्या शेतकर्यांनी राब पेरले होते ते राब शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे खराब होऊन गेले. शिवाय शेतात खडी माती देखील पाण्याच्या येवून जमा झाली. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद होऊन शेतीचे नुकसान झाल्याबाबत शेतकर्यांनी पुन्हा कडाव ग्रामपंचायत आणि तहसिल कार्यालयात अर्ज केले. कडाव ग्रामपंचायतीने देखील तहसिल कार्यालयास सविस्तर माहिती अहवाल सादर केला होता. सदर प्रकरणाची दखल कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख यांनी घेतली आहे. तहसील कार्यालयाच्या आदेशाने कडावचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून शेतांमध्ये साचून राहिलेल्या पाण्यामुळे खराब झालेल्या भाताच्या रोपांचा स्थळ पंचनामा करुन अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला आहे. करण्याचे आदेश दिले. तहसिलदार यांच्याकडे सत्यपरिस्थितीचा अहवाल सादर झाला असुन ते तहसीलदार स्वतः प्रत्यक्ष शेतकर्यांच्या शेतीची पाहणी करुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन शेतकर्यांना देण्यात आले आहे.