एसआरटी पद्धतीने भातलागवड कमी खर्चाची

विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांचे उद्गार
चौक येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

। रसायनी । वार्ताहर ।
एसआरटी पद्धतीने केलेली भातलागवड ही पारंपरिक भातलागवडीपेक्षा कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारी पद्धत असून, जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या पद्धतीने भातलागवड करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले. चौक तुपगाव येथील एसआरटी भात लागवडीची पाहणी करुन त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत अंकुश माने यांनी कल्पेश गुरव या शेतकार्‍याने केलेल्या एसआरटी भातलागवडीची पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांना पीक विमा, म.ग्रा.रो.ह.यो. फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, पी.एम.एफ. इत्यादी योजनांबाबत शेतकर्‍यांशी चर्चा करुन त्यांना येणार्‍या अडचणींबाबत मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान, रमेश साळवी यांनी घेतलेल्या म.ग्रा.रो.ह.यो. फळबाग लागवड योजनेतील आंबा कलमांची लागवड माने यांच्या हस्ते करण्यात आली.

या कार्याक्रमास देशमुख, म.कृ.अ. खालापूर, सुभाष मुंढे, अध्यक्ष शेतकरी संघटना, योगेश गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष, देविदास गुरव, नथुराम गुरव, शिंदे, कृ. प. राठोड, कृ.स. व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version