। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. यावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे.
त्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आक्षप घेत न्यायालयाच्या निकालाची प्रत आपल्या ट्विटमध्ये जोडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.१६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.