मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रही निकाल मिळविणार – अजित पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।
इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठीच बाठिया समिती नेमली आहे. मध्य प्रदेशचा अहवालही आपण बघितला आहे. न्यायव्यवस्थेनं दिलेल्या निकालाचं आम्ही स्वागतच करतो. पण आम्ही इम्पिरिकल डाटा दिल्यानंतर मध्य प्रदेशनं जसा हा निकाल मिळवला, तसा आम्हीही प्रयत्न करणार आहोत,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलं. विधिमंडळात एकमताने ओबीसी आरक्षणाबाबतचं विधेयत मंजूर झालं. सर्वपक्षीय चर्चा झाली. वेगवेगळी मतं आली. त्यातून राजकारण न आणता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कृती झाली. विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपालांनीही त्यावर सही केली. ते अंमलात आणलं. आजही सर्वोच्च न्यायालयानं ते विधेयक बेकायदेशीर ठरवलेलं नाही, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

मुंबई कारागृहात भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. बाठिया आयोगाचा अहवाल आला की मध्य प्रदेश सरकार जसं सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं आम्ही जूनमध्ये बाठिया कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर आमचं म्हणणं मांडणार आहोत. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 50 टक्क्यांच्या पुढे जागा न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं असा आमचा प्रयत्न राहील. आम्ही त्यानुसार कामाला सुरुवात केली आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. प्रयत्नांती परमेश्‍वर असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Exit mobile version