महात्मा गांधी रस्त्याचे काम नित्कृष्ट

एमएमआरडीए कडे तक्रार

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरातील मुख्य रस्त्याचे काम सध्या सुरू असलेले काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केला आहे. तशा आशयाची तक्रार पारटे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे लेखी स्वरूपात केली आहे. दरम्यान, प्रामुख्याने सध्या सुरू असलेले रस्त्याचे काम हे नैसर्गिक मातीच्या रस्त्यावर केवळ ग्रीड टाकून केले जात आहे आणि दर्जा राखून काम व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.

प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये जनार्दन पारटे यांनी जुन्या रस्त्यावरील नैसर्गिक मोकळा रस्ता ठेवण्यात आलेल्या त्या भागात आता डबर टाकून पीसीसी करणे गरजेचे असताना तसे न करता खराब खडी आणि त्यावर केवळ ग्रीड टाकून रस्ता बनविला जात आहे. अत्यंत घाईघाईने गेल्या पंधरा दिवसांत मुख्य रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रकार योग्य नाही. कामाचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी प्राधिकरणकडून शाखा अभियंता आणि नगर परिषद यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. एमएमआरडीएने रस्त्याच्या कामाच्या मूळ निविदानुसार कामे करावी अन्यथा केलेली कामावर आम्ही योग्य मार्गाने आमचा आक्षेप नोंदवू, अशी सूचना पारटे यांनी प्राधिकरणकडे तक्रारीत केली आहे.

Exit mobile version