| अलिबाग | प्रतिनिधी |
येथील ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयामध्ये अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. मैथिली भगत आणि अभिजित पाटील यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य गावंड-चैतन्य पाटील यांच्या संघाने द्वितीय क्रमांक, आकांक्षा खैरकर-दिग्विजय कार्वेकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक, तर चैत्रवी माईनकर-नेहा पोकळ यांच्या संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच आदित्य गावंड या विद्यार्थ्याची उत्तम मूटर म्हणून निवड करण्यात आली. आदित्य गावंड आणि चैतन्य पाटील यांना उत्तम मेमोरियल म्हणून निवडण्यात आले. प्रा.मनोज धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारीकरिता उत्तम मार्गदर्शन केले.
स्पर्धेमध्ये विधी महाविद्यालयातील 5 वर्षे आणि 3 वर्षे अभ्यासक्रमाच्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना न्यायालयामध्ये कामकाज कसे चालते तसेच, न्यायालयात कसे, वागावे हे अनुभवण्याकरिता अभिरुप न्यायालय उपक्रम फायदेशीर ठरतो. या स्पर्धेकरिता भारतीय दंड संहितेमधील कलम 361 आणि 366 अंतर्गत एक केस देण्यात आली होती. सदर केसमध्ये सेशन न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुध्द सीआरपीसीचे कलम 374(2) अंतर्गत अपिल करायचे होते. या अभिरुप न्यायालय स्पर्धेच्यानिमित्ताने सेशन न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे कामकाज कसे चालते यासंदर्भात माहिती करुन देण्यात आली.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ.साक्षी पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा.नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.मनोज धुमाळ, प्रा.निलम म्हात्रे, प्रा.चिन्मय राणे, प्रा.पियुषा पाटील, शिक्षकेतर कर्मचारी निखिल माळी तसेच, विद्यार्थी अनिकेत मोरे यांनी कार्यक्रमाची यशस्वीपणे तयारी केली. या कार्यक्रमासाठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.डॉ.संदीप घाडगे यांनी प्रास्ताविक केले.