रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात केली शेकापने तक्रार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील रस्त्याच्या माणकुळे तीन फाटा ते बहिरीचा पाडा कामाची पोलखोल माणकुळे ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य विक्रांत पाटील यांनी केली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाच्या असलेल्या या कामाचे व्हिडीओ काढून सहज डांबर उखडून निघत असल्याचे सिद्ध केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र गिरी यांची भेट घेऊन तक्रार देखील करण्यात आली आहे. खनिकर्मातून 42 लाख रुपयांच्या निधीतून सदर काम मुदत संपल्यानंतर कार्यारंभ आदेशाविनाच करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेत माणकुळेचे माजी सरपंच सत्यविजय पाटील, माजी सरपंच डॉ मनोज पाटील, 18 गाव भुवनेश्वर ट्रस्ट समिती उपाध्यक्ष कमळाकर पाटील, सदस्य विक्रम पाटील, माजी उपसरपंच प्रदीप पाटील, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र गिरी यांची भेट घेऊन त्यांच्या सदरची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. सदरच्या कामाची मुदत 31 मार्च 2022 रोजी संपली आहे. त्यासाठी वाढीव मुदतीचे पत्र देखील दिलेले नाही. असे असताना या कामाचे कार्यारंभ आदेश न देताच हे काम करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे इस्टिमेंटनुसार हे काम केलेले नाही. तसेच 7 मीटरची भिंत देखील केलेली नाही. त्यामुळे बोगस कामाचे बिल अदा करण्यात येणार नसल्याचे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र गिरी यांनी सदर शिष्टमंडळाला दिले. यावेळी शाखा अभियंता पुजा, वरिष्ठ अभियंता शेळके दालनात उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नारंगीचा टेप स्मशानभुमी हे काम देखील याच कंत्राटदाराने करताना जुन्या क्राँकीटवर सोलींग न करता काँक्रीटीकीकरण काम केले आहे. दरम्यान या संदर्भात शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी संपर्क साधून निकृष्ट दर्जाचे काम करणार्या कंत्राटदाराला पाठिशी घालु न देता योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.