उर्मिला राजोपाध्ये
काही महिन्यांपूर्वी मराठी लेखक सोनाली नवांगुळ, भालचंद्र नेमाडे आदींना साहित्य अकादमींनं गौरवलं होतं; परंतु तो सन्मान जीवनगौरव आणि भाषांतरित साहित्याचा होता. आता साहित्य अकादमीनं पुरस्कारांनी गौरवलेले लेखक युवक असून सामान्यांमध्ये वावरणारे असल्याने त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार सामान्यांना अधिक जिव्हाळ्याचा वाटला, तर नवल नाही.
साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभणं, हा त्या लेखकाचा जसा सन्मान असतो, तसाच ते ज्या भाषेत लिहितात आणि ज्या राज्याचे ते प्रतिनिधी आहेत, त्यांचाही सन्मान असतो. मोठ्या लेखकांना पुरस्कार मिळाला, तर त्यांचं कौतुक होणं स्वाभाविक आहे; परंतु सामान्यांचे प्रतिनिधी असलेल्यांना आणि तुमच्या-आमच्यात ज्यांचा सातत्यानं वावर आहे आणि सामाजिक नाळ तुटलेली नसणार्यांना पुरस्कार मिळतो, तेव्हा त्याचं कौतुक वेगळंच असतं. आता साहित्य अकादमीने 22 भाषांमधल्या पुरस्कारांची घोषणा केली. यादी लांबलचक आहे; परंतु आपल्या दृष्टीनं तीन नावं जास्त महत्त्वाची आहेत. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या पुस्तकासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसंच मराठीतले युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे तर संजय वाघ यांना बाल पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण गुरव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, साहित्य अकादमी पुरस्काराचा खूप आनंद होणं स्वाभाविक आहे. माझ्याबरोबरच कथा या साहित्यप्रकारालाही या पुरस्काराने बळ दिलं आहे.
खेड्यापाड्यातल्या नव्यानं लिहितं होणार्या मुलांना कथा हा साहित्यप्रकार त्यातल्या वेल्हाळपणामुळे आपलासा वाटतो. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या शीर्षककथेतला बाळू हा अशा मुलांचा प्रतिनिधी आहे. शिक्षणासाठी शहराकडे होणारे बाळूचे स्थलांतर हळूहळू त्याचं मानसिक अवस्थांतर बनतं. बाळूची खेडूत मानसिकता आणि तिला दिसणारं अक्राळविक्राळ शहर यांच्यातला संघर्ष हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातल्या अनेक मुलांना ही आपलीच कथा वाटते. या संग्रहातली इंदूलकरांची कथादेखील कथानिर्मिती, लेखकाचं चरित्र आणि त्याचा काळ यांची परस्परगुंफण तपासते. या इंदुलकरांना कधी कधी त्राग्यानं जीवसृष्टीत जन्माला आल्याबद्दल वाईटही वाटतं; पण कथेत सरतेशेवटी ते आपल्या जन्मास कारण ठरलेल्या भैरीस्वरूप निसर्गाचे, आईवडीलांचे ऋणी होतात. आपला जन्म म्हणजे या सर्वांनी मिळून सृष्टीत घडवून आणलेला एक छोटासा जैविक महास्फोट आहे, या निष्कर्षाला ते अखेरीस येतात. माझ्यापेक्षा हा कथेचा सन्मान आहे, असं मी समजतो. जयंत पवार या अफाट कथाकाराची आठवण या पुरस्काराच्या क्षणी मनाला कातर करत आहे. मराठी कथेला आणि खेड्यातल्या अनेक लिहित्या हातांना या पुरस्कारानं ऊर्जा मिळावी अशी अपेक्षा. कोल्हापूरजवळच्या खेड्यात राहून कथालेखन करणार्या गुरव यांच्या कथा राज्यस्तरीय स्पर्धांमधून विजेत्या ठरल्या आहेत.
देशातल्या साहित्यक्षेत्रातली सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणार्या साहित्य अकादमीनं 2021 च्या युवा पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातल्या 22 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात तिघा मराठी युवकांचा समावेश आहे. त्यातलं प्रणव सखदेव हे मराठीमधल्या आघाडीच्या तरुण लेखकांमधलं प्रसिद्ध नाव आहे. ‘पायर्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, ‘निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हे कथासंग्रह आणि ‘काळेकरडे स्ट्रोक्स’, ‘96 मेट्रोमॉल’ या त्यांच्या कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी प्रमुख मराठी दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून काम केलं आहे. ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक आणि अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. अनुवाद-प्रकल्पासाठी त्यांना 2015-16 ची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून त्यांनी इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येतं. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही त्यांची कादंबरी आजच्या जगण्याचे संदर्भ घेत तरुणाईचं एक वेगळं भावविश्व, त्यातली आवर्तनं आणि आंदोलनं उभी करते. या कादंबरीतल्या पात्रांच्या जीवनात चांगलं साकारायला जावं आणि सतत फटकार्यांनी चित्राचं सौंदर्य बिघडावं असे प्रसंग घडतात. तरुणाईचं विस्कटलेलं भावविश्व प्रणव सखदेव यांनी या कादंबरीत उत्तमरित्या मांडलं आहे. सहज आणि साधी संवाद शैली, व्यक्तीरेखा उभी करण्याची उत्तम हातोटी, ओघवतं लेखन ही या कादंबरीची बलस्थानं आहेत.
चरितार्थासाठी पत्रकारिता आणि आवड म्हणून लेखन करणार्या संजय वाघ यांना बालसाहित्यातल्या योगदानासाठी यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. वाघ यांची आठ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांना नाशिकच्या सावाना वाचनालयाचा बालसाहित्यिक पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराबद्दल ते म्हणतात की साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणं ही तशी प्रत्येक लेखकासाठी सर्वोच्च आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. त्या आनंदाचा मी एक भाग झालो याचं अतीव समाधान आहे. आत्मविश्वास हरवलेल्या मुलांना प्रेरणा, उभारी मिळावी या हेतूनं लिहिलेल्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीवर पसंतीची मोहोर उमटल्यानं आपल्या लेखनाचं चीज झालं असं मला वाटतं.
संजय वाघ हे एक संवेदनशील बालसाहित्यकार आहेत. ‘जोकर बनला किंगमेकर’, ‘गोष्ट बोलक्या पोपटाची’ आणि ‘बेडकाची फजिती’ ही त्यांची बालसाहित्यातली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांना बालसाहित्यासाठी मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या ‘गाव मामाचं हरवलं’ या बालकवितासंग्रहात बालकुमारांच्या आवडीच्या विषयावरील 23 कविता आहेत. प्रस्तुत संग्रहाची पाठराखण करताना ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे म्हणतात त्याप्रमाणे बालसाहित्य लिहिणं ही अतिशय गंभीरपणे करायची कृती आहे. श्री. वाघ हे बालसाहित्याकडे तितक्याच गंभीरपणे पाहतात, हे संग्रह वाचताना जाणवतं.
खारुताईशी गप्पा मारताना कवितेतला इटुकला बाळ विचारतो:
‘अंगाखांद्यावर झाडाच्या
तुरुतुरु तू खेळत राही
पाय घसरून पडशील खाली
भीती तुला कशी वाटत नाही?’
खारूताईविषयी
वाटणारी ही काळजी या संवेदनशीलतेतूनच आलेली आहे. संवेदनशीलतेबरोबरच या कवितेत एक प्रकारचा निर्मळ खेळकरपणा आहे. ‘ढगदादा’शी संवाद साधताना कवितेतला मुलगा म्हणतो,
‘आकाश तुझे, जमीन माझी
तूही चिखलात नाचून बघ
कपडे खराब झाल्यावर
मार आईचा खाऊन बघ’
पर्यांचं जग हे खरं नसतं. ते काल्पनिक असतं, हे तुम्हा-आम्हा वय वाढलेल्या माणसांना माहीत आहे; पण बाळगोपाळांना पर्यांच्या जगात रमायला आवडतं. स्वप्नात आलेली परी चिमुकल्याला पंखांवर बसवून फेरफटका मारून आणते. तो अनुभव सांगताना ‘स्वप्नात आली परी’ या कवितेतला मुलगा म्हणतो:
‘झाडे, नदी, डोंगर, नाले
पाहिले आम्ही वरून
पक्ष्यांशी स्पर्धा केली
थव्यात त्यांच्या शिरून’
हे काल्पनिक जगही बाळगोपाळांना जीव रमवायला पुरेसं असतं. ती त्यांची भावनिक गरज असते. आजच्या जगाला जेट विमानाची गती आली असली, तरी बालकांच्या मनातील ‘झुकझुकगाडी’चं आकर्षण जराही कमी झालेलं नाही.
‘झुकझुकगाडी, झुकझुकगाडी
चालते कशी थाटात
लेक शिरते आईच्या कुशीत
वाटते तशी घाटात ’
हीच आगीनगाडी नागमोडी वळणावर सापासारखी दिसते आणि वळण संपलं की सुतासारखी सरळ होते, याचंही कौतुक आहेच!