18 जणांचा होरपळून मृत्यू
| आंध्र प्रदेश | वृत्तसंस्था |
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी काकीनाडा जिल्ह्यातील समरलाकोटा विभागातील वेट्टलापलेम-जी. मेदुपाडू दरम्यान असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात हा अपघात झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की कामगारांचे मृतदेह शेकडो फूट शेतात फेकले गेले. हा कारखाना पेडापुडी रोडवर राहणाऱ्या अदापा नानी यांच्या कुटुंबाचा असल्याचे सांगितले जाते. स्फोटानंतर संपूर्ण परिसर दाट धुराने भरला होता. कारखान्यात मोठ्या प्रमाणात स्फोटक साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले, ज्यामुळे आत काम करणाऱ्या कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताच्या वेळी कारखान्यात सुमारे 30 लोक काम करत होते. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सरकार लवकरच मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर करेल अशी आशा आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहे. या भीषण आगीत अनेक जण गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
