मुख्य अभियंता यादवांची चौकशी करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथे असलेल्या मध्य रेल्वे अधिकारी वर्ग विश्रामगृहात राहणार्या कंत्राटी कामगारांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला. मात्र, त्या कामगारांना रेल्वे विश्रामगृहात राहण्याची परवानगी दिली कोणी? मध्य रेल्वेवरील खोपोली ते विठ्ठलवाडी या भागाची वर्क्स विभागाची जबाबदारी असलेले अभियंता एस.के. यादव यांच्याकडून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केल्याने याप्रकरणी यादव यांची चौकशी मध्य रेल्वेने करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
माथेरान येथील अधिकारी विश्रामगृहात कंत्राटी कामगार सुशांत सुनील गेजगे याचा मृत्यू झाला आहे. 13 मार्च रोजी तेथे राहणार्या दोन मित्रांनी सुशांत गेजगे याचा खून केला असून, तेथे धारदार शस्त्र आली कुठून, असा प्रश्नदेखील पुढे आला आहे. रेल्वेकडून येथे कंत्राटी कामगारांची नियुक्ती वर्क्स विभागाचे अभियंता एस.के. यादव यांनी केली होती.त्यात त्या ठिकाणी असलेल्या चार कामगारांना कामावर ठेवताना रेल्वे प्रशासनाने करार केले नसल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे यादव यांनी मनमानी करून तेथे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटी कामगारांची नियुक्ती केल्याने खून प्रकरण वेगळ्या वळणावर गेले आहे. हा खून रात्री अकरा ते बारा या दरम्यान झाला. मात्र, त्याची उकल सकाळी सव्वा सहा वाजता झाली आहे. त्यामुळे दिनेश संतकुमार तिवारी आणि प्रेम किशोर जिगंदर किशोर पाल या दोघांनी धारदार शस्त्राने खून करुन स्वतः विश्रामगृहामधील दोन वेगवेगळ्या खोलीत झोपले.
दिनेश तिवारी आणि प्रेमकिशोर पाल हे रेल्वे अधिकारी विश्रामगृहात सर्व खोल्यांचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे वरील अधिकारी वर्गासाठी असलेले विश्रामगृह कंत्राटी कामगारांसाठी दिले होते काय? याची चौकशी मध्य रेल्वेकडून झाली पाहिजे. दरम्यान, सर्व कंत्राटी कामगारांना माथेरान येथे आणणारे वर्क्स विभागाचे अभियंता एस.के. यादव यांची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
या खूनप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने करीत आहेत. मात्र, कंत्राटी कामगार यांच्याकडे धारदार शस्त्रं आली कुठून, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.