कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही मिळत नाहीये तिकिट
पर्यटकानांही होतेय अडचण
। माथेरान । वार्ताहर ।
डोंगर माथ्यावर वसलेल्या माथेरानकरांसाठी कोरोना काळामध्ये रेल्वे प्रवास करावयास मिळणार नाही. कारण दोन डोस घेऊन सुद्धा त्यांना तिकीटच मिळत नसल्याने माथेरानमधील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी वाट पाहावी लागणार आहे.
माथेरान हे पुणे व मुंबई या मार्गावरील सर्वात लहान पर्यटन स्थळ, येथे जाण्यासाठी या मार्गावरील नेरळ स्थानकातून जावे लागते. माथेरान येथे मिनिट्रेन चालते व ती पर्यटकांसाठी सेवा देत असल्याने त्यामध्ये दोन डोस किंवा इतर निर्बंध नाहीत. पण त्याच लोकांना जेव्हा नेरळ येथे येऊन रेल्वे ने प्रवास करावयाचा असल्यास अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. पण ह्यात माथेरान मधील स्थानिकांचे मात्र मरण झाले असून दोन डोस घेऊन ही त्यांना रेल्वे ने प्रवास करता येणार नाही- कारण दोन डोस घेतल्याचे परवानगी पत्र ग्रामपंचायत किंवा पालिकेकडून घेऊन मग त्यांना मासिक पास दिला जाणार असल्याचे रेल्वे ने जाहीर केल्याने आयत्यावेळी माथेरांकरांना तिकीट मिळत नसल्याने त्याचा त्रास भोगावा लागत आहे
माथेरानमध्ये वाहनास बंदी असल्याने अनेकांना वाहन चालविता येत नाही. तसेच खाजगी वाहन घेऊन जाणे सर्वाना परवडत नसल्याने शासकीय वाहनांचा वापर अनेकजण करीत असतात. पण माथेरान सारख्या दुर्गम भागातून वैद्यकीय शिक्षणासाठी शहरात जाणार्या नागरिकांना रेल्वेच्या नियमांची माहिती नसल्याने नेरळ येथे आल्यानंतर अडवणूक होत आहे. दहावी, बारावीचे अॅडमिशन सुरू असल्याने अनेकांना शहरात जावे लागत आहे, पण त्यांना तिकिटच मिळत नसल्याने त्यांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळेच माथेरांमधील नागरिकांना कोरोना काळामध्ये रेल्वे प्रवासास मुकावे लागत असून त्याचा फटका विद्यार्थी व वैद्यकीय सुविधांसाठी जाणार्या नागरिकांना सोसावा लागत आहे.