रायगड मधील स्वाध्यायी सागरपुत्रांची सहावी मत्स्यगंधा
पनवेल । प्रतिनिधी ।
वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पदमविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या विविध प्रयोगांपैकी एक असणाऱ्या ‘मत्स्यगंधा’ या आगळ्यावेगळ्या बोटीचे जलावतरण नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पनवेल येथे करण्यात आले. यावेळी स्थानिक पुजा-यांच्या वतीने शात्रोक्त विधिवत पूजा करण्यात आली. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे नियमांचे कडक पालन करून या मत्स्यगंधा जलावतरणाचा कार्यक्रम मोजक्याच स्वाध्यायी व मत्स्यगंधेवरील सागरपुत्र पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘सागरपुत्र’ म्हणून गौरवलेल्या कोळी बांधवांचे तरते मंदिर म्हणजे ‘मत्स्यगंधा’. केवळ फुले, हार अर्पण करूनच पूजा होते असे नव्हे तर स्वतःची निपुणता अर्पण करून पूजा होऊ शकते हे गीततले तत्त्वज्ञान दादांनी लाखों लोकांमध्ये जिवंत केले. मत्स्यगंधा हा केवळ एक कोळ्यांमधला प्रयोग नाही तर तो माणसावरचा प्रयोग आहे. या निपुणता-समर्पण भावनेतून माणूस घडला जावा, त्याच्या जीवनात भाव, कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता यावी तसंच जो भगवंत सतत माझे जीवन चालवतो त्याच्या प्रती कृतज्ञता निर्माण व्हावी, त्याच्या करता मी काहीतरी करतोय ही भावना निर्माण व्हावी म्हणून हा प्रयॊग आहे.
सागरपुत्रांची ही मत्स्यगंधा ही देवाची बोट. या ‘मत्स्यगंधा’ बोटीचा कुणी मालक नाही, इथे काम करणारा कुणी मजूर नाही तर या बोटीवर आपली निपुणता अर्पण करणारे सर्व सागरपुत्र या मत्स्यगंधेचे ‘पुजारी’ आहेत. हे पुजारी आळीपाळीने या मत्स्यगंधेवर जात असतात व अखेरीस जे उत्पन्न येईल ते देवाचे या भावनेतून एक प्रकारची वेगळी लक्ष्मी निर्माण करतात.
सागर किनारपट्टीवर दादांच्या अनेक मत्स्यगंधा डौलाने उभ्या आहेत, त्यातील महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील ही सहावी मत्स्यगंधा आहे. सध्या नांदगाव (मुरुड), थेरोंडा, अलिबाग, करंजा (उरण) आणि रेवस (अलिबाग) या स्वाध्यायी सागरपुत्रांनी उभ्या केलेल्या पाच मत्स्यगंधा कार्यरत आहेत व यात आता पनवेलच्या मत्स्यगंधेची भर पडली आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशीच पालघर तालुक्यात सातपाटी, वडराई तसेच डहाणू जवळ वडकून येथेही स्वाध्यायी सागरपुत्रांच्या अशाच नवीन तीन मत्स्यगंधा बोटींचे जलावतरण करण्यात आले.
दादांचे हे सागरपुत्र कुणाच्याही मदतीशिवाय, कुणापुढेही हात न पसरता ही बोट बांधतात ही महत्त्वाची गोष्ट. स्वतःच्या श्रमाने भगवंताची अपौरुषेय लक्ष्मी (impersonal wealth) उत्पन्न करणारे आणि ती लक्ष्मी ‘प्रसाद’ रूपाने कुठलीही प्रसिद्धी व गाजावाजा न करता आपल्या समाजात वितरित करणारे पांडुरंगशास्त्रींचे हे सागरपुत्र व पांडुरंगशास्त्रींचा हा अनोखा प्रयोग हे खरोखरच विशेष आहेत.