गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

दिवाळी सणाच्या दिवसांत नागरिक मोठ्याा प्रमाणात खरेदीसाठी बाजारपेठा, मॉल्स तसेच सोसायट्यांमध्ये गर्दी करत असल्याने या काळात घरफोडी, पाकीटमारी, सोनसाखळी चोरी तसेच सायबर फसवणुकीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, या कालावधीत विशेष सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबत सूचित केले आहे.

दिवाळीच्या काळात सोन साखळी चोरी, छेडछाड आणि ईव्ह टीझिंग या सारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने विशेष पथके तयार केली आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठा, बँका, एटीएम सेंटर तसेच सोसायट्यांमध्ये वाढीव पोलीस गस्त घालण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक आणि बीट मार्शल्स तैनात करण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी महिलांना मदत आणि त्वरित प्रतिसाद मिळावा, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महिला कर्मचारीही देखील वाहतूक नियोजनासाठी तैनात ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त नियंत्रण कक्षाने सीसीटीव्ही पोलीस नेटवर्कद्वारे प्रमुख चौक, बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि गर्दीची ठिकाणे यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आकाशात उडविण्यात येणाऱ्या कंदीलामुळे आगीचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने तसेच समाजकंटकांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा आणि संरक्षणाचा उपाय म्हणून दिवाळीमध्ये आकाशात कंदील उडवण्यावर आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच, दिवाळी साजरी करताना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. यावेळी नवी मुंबई पोलिसांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी 112, वाहतूक हेल्पलाईनसाठी 7738393839, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनसाठी 1090 आणि महिला हेल्पलाईनसाठी 103 असे विविध हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत.

दिवाळीच्या काळात आनंद घेत असताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. मोठ्याा रक्कमेचे दागिने किंवा रोख रक्कम घेऊन बाहेर जाणे टाळावे. आकाशकंदील आणि फटाके फोडताना सुरक्षा नियमांचे पालन करावे. बाहेरगावी जाताना दरवाजे आणि खिडक्या नीट बंद ठेवाव्यात. समाजातील शांतता, सलोखा आणि सुरक्षितता राखून दिवाळीचा सण साजरा करावा. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.

– नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल शहर

Exit mobile version