उर्मिला राजोपाध्ये
जागतिक पटलावर प्रभाव निर्माण करणारा भारत आपले महत्त्व नव्याने अधोरेखित करत असताना देशाला अमाप विचारधन देणार्या द्रष्ट्या नेत्यांची आठवण आल्याखेरीज रहात नाही. 23 जानेवारी रोजी साजरी होणारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती हा असाच एक हृद्य दिवस असून दर वर्षी साजरा होणारा हा ‘पराक्रम दिन त्यांच्या जाज्वल्य विचारांचा मागोवा घेण्याचा सर्वोत्तम मुहूर्तही आहे. यानिमित्ताने…
भारताला स्वातंत्र्य मिळून बराच मोठा कालावधी लोटला, आपण हे स्वातंत्र्यपर्व जल्लोशात साजरेही केले, त्यानिमित्त विविधरंगी आणि विविधढंगी कार्यक्रम आयोजित झाले; परंतु ते ज्या महाभागांमुळे मिळाले त्यांचे स्मरण करण्यासाठी एखादाच दिवस समर्पित करणे शक्य नाही. याच धर्तीवर 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आपण ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करत असलो तरी या एकाच दिवशी नव्हे तर प्रत्येक दिवशी त्यांचे स्मरण होणे गरजेचे आहे, कारण त्यांनीही हयातभर देशाच्या स्वातंत्र्याचा आणि भविष्यातील तेजोमय भारताचाच विचार केला होता. अतिशय दृष्ट्येपणाने भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर जाऊन परकीय मदत मिळवणारा हा सेनानी होता. त्यांनी देशप्रेमाने भारलेल्या युवकांच्या पलटणी उभ्या करुन जुलमी इंग्रजी सत्तेचे सिंहासन डळमळीत करण्यात मोलाचा वाटा उचलला. म्हणूनच पराक्रम दिन साजरा करताना हा इतिहास ज्ञात नसणार्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कार्यबाहुल्याचा परिचय करुन देणे ही प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. ते उच्चविद्याभूषित होते. त्यांनी इंग्लंडमध्ये आय.सी.एस.ची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांना भारतात एक लेखी परीक्षा द्यावी लागली. पण ती देताना परिच्छेदातल्या एका ओळीने सुभाषचंद्र बोस चांगलेच भडकले. ‘भारतीय सैनिक सामान्यतः बेइमान असतात’ अशी ती ओळ होती. सुभाषचंद्रांनी संचालकांना त्याबद्दल जाब विचारला; पण त्यांनी दिलेलं उद्धट उत्तर ऐकून सुभाषबाबूंनी प्रश्नप्रत्रिका फाडून टाकली आणि उच्चपदस्थ नोकरीवर पाणी सोडले. त्यांच्यातील बाणेदार, देशाभिमानी आणि स्वाभिमानी वृत्तीचे उदाहरण या एकाच घटनेतून मिळू शकते.
पुढे नेताजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि या चळवळीला आक्रमक रुप प्राप्त झाले. दुसर्या महायुद्धाच्या काळात आपल्याविरुद्ध उठाव झाल्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना बंगालमधील अलिपूरच्या तुरुंगात डांबून ठेवले. पण सुभाषबाबूही काही कमी नव्हते. त्यांनी अन्नत्याग केला. त्यामुळे इंग्रज सरकार गडबडले आणि सुभाषबाबूंना मुक्त केले गेले; पण पुन्हा त्यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले गेले. पण ते मौलवी साहेबाच्या वेशातून तिथून निसटले आणि रावळपिंडीला गेले. नेताजींच्या जीवनातील असे एक ना अनेक रोमांचक प्रसंग विचारात घेण्याजोगे आहेत. सुभाषबाबूंनी इंग्रज सरकारला असे अनेक हादरे दिले. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत ते अग्रेसर होते. त्यांनी ‘आझाद हिंद सेना’ स्थापन करून सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि ‘जय हिंद’ची घोषणा दिली.
त्यांनी आपल्या सैन्याला ‘चलो दिल्ली’चा आदेश दिला. नेताजींचे पुण्यस्मरण करताना या सगळ्या प्रेरणादायी घटनांचे स्मरण होणे गरजेचे आहे. नेताजींनी भारतीयांना ब्रिटिशांच्या प्रभावातून बाहेर काढून स्वतंत्र विचारांकडे वळवलं. ब्रिटिशांची शस्त्रे, शिस्त, आधुनिक शोध, रेल्वे, पोस्ट हे सगळे पाहून अडाणी प्रजेप्रमाणे सुशिक्षितही दिपून गेले असताना आणि त्यांच्या आधुनिकतेपुढे आपला देश मागासलेला, बुरसटलेल्या विचारांचा वाटू लागला असताना त्यांनी नागरिकांना या भारावलेल्या अवस्थेतून बाहेर काढून आधी स्वातंत्र्य मिळवण्याची गरज समजावून सांगितली.
तो काळ स्वातंत्र्याच्या ध्यासाने भारलेला होता. अर्थात ‘स्वराज्य’ प्राप्त करण्याविषयीचे प्रत्येकाचे विचार वेगळे होते. त्यामुळे नकळत परस्पर मतभेदांचेही चित्र दिसत होते. महात्मा गांधींचा शांततामय मार्ग, अहिंसेचे धोरण, असहकाराची चळवळ एकीकडे तर दुसरीकडे क्रांंतिकारकांनी अवलंबलेला सशस्त्र क्रांतीचा विचार आणि मार्ग अशा परस्परभिन्न विचारांमध्ये स्वातंत्र्याचा विचार सापडला होता. गांधीजींच्या अहिंसेबरोबरच ‘स्वातंत्र्य फुकट मिळत नाही’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने तरुण पिढी जीवनाची होळी करण्यास तयार होत होती. स्वातंत्र्यासाठी शस्त्रांचा वापर केला पाहिजे, हे विचार त्यांना पटत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हेदेखील याच क्रांतिकारक विचारांनी भारलेले होते. त्या दृष्टीनेच त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अविरत श्रम घेतले. ओडिसातील कटक या गावी जन्मलेल्या नेताजींचे मन बालवयापासूनच ईश्वरी साक्षात्कार, अध्यात्म आणि योग या शास्त्रांकडे ओढ घेत होते. त्यामुळे कॉलेजमध्ये त्यांनी तत्वज्ञान हा विषय अभ्यासायला सुरुवात केली. मात्र तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळेच गुरुच्या शोधार्थ काही दिवसांसाठी ते हिमालयातही जाऊन आले. पण तिथेही त्यांच्या मनाला समाधान, शांती मिळाली नाही. कोलकात्याला परतल्यानंतर ते आजारी पडले. त्यातून उठल्यानंतर मात्र त्यांनी व्यायाम आणि लष्करी शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचबरोबर बी.ए.च्या अभ्यासालाही सुरुवात केली.
याच काळात विवेकानंद यांनी वक्तृत्व कला अवगत करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले. 1919 मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पित्याच्या आग्रहावरुन आय.सी.एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांचे न ऐकता सुभाषबाबूंनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राजकीय लढ्याची सूत्रे महात्मा गांधींकडे आल्यामुळे 1921 मध्ये सुभाषबाबू मुंबईत आले आणि स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी महात्मा गांधींची भेट घेतली. संधी मिळताच सशस्त्र संग्राम करुनही स्वातंत्र्य हस्तगत केलं पाहिजे, अशा विचाराचे असूनही प्राप्त परिस्थितीत गांधीप्रणित चळवळीचा विरोध न पत्करता तीत सामील व्हायचं आणि आपल्या विचाराला अनुकूल वातावरण निर्माण करायचं, असं ठरवून सुभाषबाबू कोलकात्याला परतले. तिथे त्यांनी देशबंधू चित्तरंजनदास यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याच आज्ञेवरुन कोलकात्याला राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्यप्रद स्वीकारले. त्याच सुमारास ते काँग्रेस सेवा दलाचे कामही पाहू लागले. दरम्यान, बंगालमध्ये मोठा पूर आला. सुभाषबाबूंनी सामाजिक कार्याच्या तळमळीने पूरग्रस्तांसाठी मदतकार्य केले. त्या वेळेची कार्यकुशलता पाहून पुढे त्यांना बंगाल काँग्रेसचे प्रांतिक प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आले.
पुढे 1921 मध्ये त्यांनी कलकत्त्याला प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या आगमनाप्रित्यर्थ होणार्या स्वागत समारंभावर बहिष्कार टाकण्याची योजना आखली. त्यावरुन ब्रिटिश सरकारने काँग्रेस सेवा दलाला बेकायदा ठरवले. त्याचा निषेध म्हणून बंगालभर सविनय कायदेभंग आंदोलनाला प्रारंभ झाला. त्यात सुभाषबाबूंना सहा महिन्यांची शिक्षा झाली. पण ही आपत्ती नेताजींनी इष्टापत्तीत परावर्तीत केली कारण इथेच चित्तरंजन दास यांच्याबरोबर त्यांनी भावी चळवळीच्या अनेक योजना आखल्या. 1924 मध्ये बंगाल प्रांतात क्रांतिकारकांच्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला. त्यांच्याशी संबंध असल्याच्या संशयाने सुभाषबाबूंना मंडालेच्या तुरुंगात डांबण्यात आले. मात्र हा एकांतवासही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला कारण त्याच काळात नेताजींनी इतिहास, वाङमय, धर्मशास्त्र आदी ग्रंथांचं अध्ययन केले. या स्वाध्यायामुळे त्यांच्या मनाला स्थिरता आणि शांती प्राप्त झालीच खेरीज त्याची बौध्दिक प्रगल्भताही दुणावली. त्यानंतर प्रांतिक राजकारणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने बंगालच्या राजकारणाची सगळी सूत्रेच त्यांच्या हाती आली. 1930 च्या प्रारंभापासून देशात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु झाली, त्यावेळीही सुभाषबाबूंना अटक करण्यात आली. नंतर ते कोलकात्याचे महापौरही बनले. पुढे सरकारविरोधी निदर्शने केल्यामुळे ते पुन्हा तुरुंगवासी झाले. तिथे प्रकृती बिघडल्यामुळेे उपचारासाठी देशात न ठेवता त्यांना युरोपमध्ये पाठवण्यात आले. मात्र सुभाषबाबूंना या सरकारी बंधनातूनही फायदाच झाला. यातूनच त्यांना युरोपमधल्या विविध राष्ट्रांना भेट देण्याची आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याची भूमिका काय, हे तिथल्या राज्यकर्त्यांना सांगण्याची संधी प्राप्त झाली. पुढे 1938 मध्ये हरिपूरमधल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सुभाषबाबूंची अध्यक्षपदी नेमणूक झाली. तथापि आजारी पडल्यामुळे ते अधिवेशनाचे काम करु शकले नाहीत. शिवाय महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांना सुभाषबाबूंची विचारसरणी पसंत नसल्यामुळे अध्यक्षपदी राहून काँग्रेसमध्ये फूट पाडण्यापेक्षा सुभाषबाबूंनी पदाचा राजीनामा देणे पसंत केले. स्वा. सावरकरांनी सुभाषबाबूंना रासबिहारी बाबूंप्रमाणे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन हिंदुस्थानबाहेर पडण्याचा आणि जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्त्रावधी भारतीय सैन्याचे नेतृत्व करुन हिंदुस्थानातल्या ब्रिटिश सत्तेवर बाहेरुन प्रहार करण्याचा सल्ला दिला. या उपदेशाने सुभाषबाबूंच्या विचारांना योग्य दिशा मिळाली. पण पुढे टोकियोला येताना झालेल्या विमान अपघातात देशाने हा थोर सुपुत्र गमावला. ‘पराक्रम दिना’निमित्त या कर्तृत्ववान सेनानीला त्रिवार अभिनंदन.