जिल्हा प्रशासनाने कसली कंबर
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्याची क्षमता असताना नागरिकांचे अजूनही 100% लसीकरण पूर्ण झालेले नाही, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकार्यांची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे बुघवारी आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, पेण प्रातांधिकारी विठ्ठल इनामदार, माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, अलिबाग तहसिलदार मिनल दळवी, पाली तहसिलदार दिलीप रायण्णावार, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गोविंद वाकडे हे प्रत्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, इतर प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी डॉ.किरण पाटील यांनी सर्व शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करताना दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांची माहिती प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचार्याने तातडीने घ्यावी. अद्याप एकही लस न घेतलेल्या व दुसरी लस घेण्यास पात्र असूनही प्रलंबित असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. कोणत्याही परिस्थितीत पुढील काही दिवसात जिल्ह्यातील लसीकरण प्रलंबित असलेल्या सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण तात्काळ करून घ्यावे.
सव्वा लाख दुसर्या डोसास पात्र
रायगड जिल्ह्यात 18 लाख 63 हजार 470 इतक्या नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 7 लाख 81 हजार 648 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. अद्याप 10 लाख 81 हजार 822 इतके नागरिक दुसर्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. तसेच पहिला डोस घेतल्यानंतर 28/84 दिवसांच्या विहित कालावधीनंतर (कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर 28 दिवस व कोविशिल्ड लस घेतल्यानंतर 84 दिवस ) दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 13 हजार 889 आहे.
तरी मिशन 100 टक्के लसीकरण यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक अशोक दुधे या प्रशासनाच्या तीनही प्रमुख अधिकार्यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्याची क्षमता असताना नागरिकांचे अजूनही 100 टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही, भाऊबीजेला लसीकरणाची ओवाळणी द्या.
डॉ.महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी