मोदी सरकार ‘गेट आउट’ होणार

उद्धव ठाकरेंचा नवी मुंबईत घणाघात

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र कोणावर वार करत नाही, जर कोणी वार केला तर वाघ नखे बाहेर काढतो, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब सत्तावीस वर्षे झुंजला, मात्र त्याला पुन्हा आग्रा पाहता आला नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सध्या देशात असंतोषाचा जनक बनला असून शिवसेनेच्या मशालिमुळे हुकूमशहास्वराचा बुडाला आग लागणार आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार येथे चार जून नंतर रिटायर नाहीतर गेट आउट होणार आहे, असा घनाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.5) नवी मुंबईत केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ऐरोली येथील श्रीराम विद्यालयाच्या भव्य मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंद्ये गटाची अक्षरशः पिसे सोलली. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे नाते फार जुने आहे. मी मात्र हे नाते सांगण्यासाठी येथे आलो नाही तर गद्दारांची मस्ती उतरवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तुम्हीही त्यासाठी अलात ना, असा प्रश्‍न शिवसेना पक्षप्रमुखांनी उपस्थित जनसमुदायाला विचारल्यानंतर जनसमुदायाने गद्दारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे विधान लोकमान्य टिळक यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात केले होते. त्यावेळी ते असंतोषाचे जनक ठरले होते. आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या हुकूम शहांच्या विरोधात महाराष्ट्र असंतोषाचे जनक ठरला आहे. आजच्या सरकारला डोके नाही, त्यांच्याकडे फक्त खोके आहेत. त्यामुळे हे सरकार डोकेबाज नाहीतर धोकेबाज आहे. तुम्ही कितीही जुलूम, दडपशाही करा पण एम.के. मढवी सारखे निष्ठावंत तुरुंगात गेले तरी डगमगणार नाहीत. तुम्ही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासारख्या निष्ठावांतांना ज्या तुरुंगात टाकले आहे. आता देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर तुमची जागा या तुरुंगात नक्की आहे, असाही इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते खासदार राजन विचारे, काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार विद्या चव्हाण, शिवसेना सचिव वरून सरदेसाई, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, आपचे दिनेश ठाकूर, रमाकांत म्हात्रे, पुनम पाटील, ऐरोलीचे संपर्कप्रमुख विद्याधर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, सूर्यकांत मढवी, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, युवा सेना सहसचिव करण मढवी, चेतन नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलण्याची मशीन आहेत. त्यांनी दहा वर्षात देश फक्त लुटलाच नाही तर बरबाद केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभांना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे, लाखो लोक सभांसाठी जमत आहेत. ही गर्दी हे येत्या चार जून रोजी नरेंद्र मोदी यांना रिटायर केल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी हे निराश, हताश आणि हतबल माणूस बनले आहेत. जगात सर्वात मोठा ढोंगी माणूस कोण, असा प्रश्‍न विचारला तर नरेंद्र मोदींचे नाव पुढे येईल. तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, आता तुमचे कमळ महाराष्ट्र राहू देणार नाही. भाजप राजकीय नकाशावरून नष्ट होणार आहे.

आयोध्यामध्ये नरेंद्र मोदी रोड शो करीत आहेत पण त्यांनी हे लक्षात ठेवावे अयोध्येतील राम आमच्या पाठीशी उभा आहे. आजची सभा ही श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. हेच आमचे श्रीरामाची नाती आहे. शिवसेना गुजरातच्या दोन चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना संपू शकली नाही. धनुष्यबाण चोरून तुम्ही ज्या गोल्डन यांच्या हातात दिलाय त्या गोल्डन यांची एक्सपायरी डेट आता संपलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हुकूमशाहांची तडफड आणि फडफड कायमस्वरूपी थांबणार आहे. झोला लेकर आया था झोला लकर जाऊंगा, असे म्हणत मोदींना त्यांच्या इच्छेनुसार हिमालय जावे लागणार आहे, असे फटकारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी भाजपवाल्यांना लगावले.

Exit mobile version