पावसाळ्यातील रानभाज्या खवय्यांसाठी पर्वणी

| माणगाव | प्रतिनिधी |

पावसाळा म्हणजे रान भाज्यांची पर्वणी असते. काही भाज्या पावसाळ्यापूर्वी उगवतात तर काही भाज्या ह्या पावसाळ्यात उगवतात. शेवळं, कुडा, आकुड, टाकला इत्यादी रानभाज्या पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात उगवतात. या रानभाज्या खायला चवदार व पौष्टिक असण्यासोबतच औषधी व गुणकारी असतात. त्यामुळे या रानभाज्यांना पावसाळ्यात खवय्यांची मोठी मागणी असते. या रानभाज्यांची खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात. या भाज्या बाजारपेठेत दाखल झाल्यावर खवय्ये आवर्जून या भाज्या विकत घेत असतात.

गेल्या काही दिवसांपासून रानातील रान भाज्यांना बहर आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत रान भाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, रानभाज्याना मोठी मागणी आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात रानात कुडा, शेवल, आकुड, टाकला इत्यादी रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात. या रानभाज्या खायला चविष्ट व पौष्टीक असतात. पावसापूर्वी ऋतूत येणाऱ्या या भाज्या खवय्यांच्या पसंतीच्या असून, या ऋतूत या भाज्यांना चांगली मागणी आहे. रानभाज्या उगवल्या असून पावसाळा वाढत जाईल तशा अनेक भाज्या तयार होणार आहेत. आदिवासी स्त्रिया रानावणात फिरून सदर भाज्या मिळवतात. या भाज्या विकून त्यांना रोजगार मिळत असून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. साधारण 20 ते 100 रुपयांपर्यंत या भाज्या विकल्या जातात. आवक वाढेल तशी दहा रुपये प्रति जुडी मिळेल. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या खरेदी करण्यासाठी प्रवासी व नागरिक आवर्जून थांबून सदर भाज्या खरेदी करत आहेत. या भाज्या विशेष प्रकारचे संस्कार करून शिजवाव्या लागतात. काही भाज्या उकडून शिजवून घ्याव्या लागतात. काही भाज्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा झाड पाला मिसळावा लागतो म्हणजे या भाज्या खायला चवदार लागतात व बाधत नाहीत.

Exit mobile version