| पेण | प्रतिनिधी |
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून अगदी धीम्यागतीने सुरु आहे. शिवाय या महामार्गावर जे नवीन काम केले आहे त्यावर देखील मोठेमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर पेण तालुक्यातील माझं पेण या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गच बंद करण्याचा इशारा दिला आहे आणि त्याबाबतचे निवेदन संघटनेच्या माध्यमातून पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना देण्यात आले आहे.
बारा वर्षे पूर्ण झाली तरी महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. मात्र याकडे प्रशासनाचे वा लोक प्रतिनिधीचे लक्षच नाही. बारा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही मोठया पक्षाच्या आघाड्या, युत्या आणि महाविकास आघाडीचे सरकार येऊन गेले. मात्र कोणत्याही सरकारला या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात यश आले नाही. या महामार्गाचे काम तर पूर्ण होत नाहीच पण जे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत त अपघातांना कारण ठरत आहेत. परिणामी मागील दशकात शेकडो प्रवशांना प्राण गमवावे लागले आहेत तर हजारो प्रवाशांना अपघातग्रस्त व्हावे लागले आहे.
महामार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण गरोदर स्त्रिया या सर्वच प्रकारच्या प्रवाशांना आत येथून प्रवास करणे नको झाले आहे. प्रवास करताना अनेकांना खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार, पाठदुखी, मानदुखी तर धुळीमुळे श्वसनाचे विकार जडले आहेत. पत्रकारांपासून ते अनेक सामाजिक संघटनांनी विविध आंदोजने करुन देखील ठेकेदार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काहीच हालचाल करत नसल्याने आता पेण तालुक्यातील माझं पेण या सामाजिक संघटनेने येत्या 16 ऑक्टोबर रोजी थेट मुंबई गोवा महामार्गच बंद करण्याचा इशारा दिला आहे.
खराब झालेल्या रस्त्याचा नमूना आपल्या सर्वांसमोर आहे. गेली बारा वर्षे रायगडवासीय प्रवासी हा त्रास सहन करत आहे. अनेकांचे प्राण गेले आहेत. नवीन रस्ता देखील आठ दिवसात उखडला असुन मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे आम्ही शासनाला जागे करण्यासाठी महामार्ग बंद करुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन अराजकीय असून जनतेने जनतेसाठी उभारलेला लढा आहे, त्यामुळे या आंदोलनात सर्व प्रवासी आणि जनतेने सहभागी व्हावे.
राजेंद्र पाटील
समन्वयक, माझं पेण संघटना