वाहतूक धीम्या गतीने सुरू
| सुकेळी | वार्ताहर |
रविवारी सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग हा पूर्णपणे धुक्यात हरवला होता. जणू काही महामार्गावर धुक्याची चादर पसरलेली दिसून येत होती. त्यातच महामार्गावरील मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळेदेखील वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
रायगड जिल्ह्यात सध्या सर्वत्र पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडलेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रविवारी सकाळचे 9 वाजेपर्यंतदेखील धुक्याचे प्रमाण एवढे होते की, चालकांना वाहन चालवताना समोरचे 7 ते 8 फूट अंतरावरीलदेखील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करुन ठेवली. त्यानंतर काही वेळाने धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच पुन्हा वाहतूक सुरळीत सुरु झाली.