। नागोठणे । वार्ताहर ।
पैशांची गरज असलेल्या 23 वर्षीय तरुणाने आपल्या 18 वर्षीय मित्राचा बळी घेतल्याची घटना नागोठण्यात सोमवारी (दि.29) घडली. गळ्यातील सोन्याची साखळी न दिल्याने ती मिळविण्यासाठी नागोठण्यातील आंगरआळी येथील प्रितेश केदारी याने कुंभार आळीतील त्याचा जिवलग मित्र साहिल संजय कडू याच्या मानेला दोरीने आवळून खून केला.
साहिल कडू हा मित्रासोबत बाहेर जातो, असे आई-वडिलांना सांगून सोमवारी दुपारी 1.50 वा. च्या सुमारास घरातून निघून गेला होता. खूप वेळ होऊनही तो घरी न परतल्याने तसेच आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो न सापडल्याने मंगळवारी (दि.30)नागोठणे पोलीस ठाण्यात त्याचे वडील संजय कडू यांनी मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी साहिल याच्या मोबाईल कॉलच्या तपशीलाच्या आधारे जलदगतीने तपास करून सर्व संशयितांना ताब्यात घेतले. यातील मुख्य संशयित प्रितेश केदारी याची कसून चौकशी करताना त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याच्याकडून या खूनाच उलगडा झाला. आरोपी प्रितेशकडूनच मिळालेल्या माहितीनुसार, वासगाव रस्त्यालगतच्या जंगलात मारून टाकलेला साहिलचा मृतदेह पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला.
नागोठण्यातील कोएसो अग्रवाल हायस्कूलच्या पुढे व वासगावकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूला पायवाटेने जाणार्या जंगल भागात दुपारी 3 च्या सुमारास हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रितेशला पैशाची गरज असल्याने त्याने साहिलच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र साहिलने त्यास विरोध केल्याने झालेल्या झटापटीत आरोपी प्रितेश याने त्याच्याजवळ असलेल्या दोरीने साहिलचा गळा आवळून त्यास जीवे ठार मारले.
साहिलची सोन्याची चैन विकण्यासाठी गेलेल्या प्रितेश याच्यासोबत अजून 2-3 जण असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने या खून प्रकरणात आणखी काहीजण असल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या घटनेशी संबधित सर्व सह आरोपींचा शोध घेऊन संबधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत साहिलच्या नातेवाइकांनी केली आहे.