| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान 3.0 हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही या अभियानाला प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, या अभियानात जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींनी नोंदणी करून सहभाग नोंदविला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.
पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये रायगड जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींनी नोंदणी करून सहभाग नोंदवला आहे.
अभियानात करण्यात येत असलेली कामे
अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जात आहेत. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे.
कार्यशाळेचे आयोजन
माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व एमआयएस डेटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विभागीय तांत्रिक तज्ञ संजीवनी जाधव या मार्गदर्शन करणार आहेत. माणगाव, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यातील ग्रामपंचायतींची कार्यशाळा 17 ऑक्टोंबर रोजी तर अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, उरण, सुधागड, मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायतींची कार्यशाळा 18 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये रायगड जिल्ह्यात उत्तम काम सुरू आहे. जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींनी नोदणी केली आहे. सर्व गावांचे गाव कृती आराखडे तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, एन.एस.एस., पर्यावरण स्नेही, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध घटकांचे योगदान लाभत आहे.
डॉ. किरण पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.