स्थानिक आमदारांचा घेतला समाचार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
राज्य सरकार नैना प्रकल्प शेतकर्यांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकर्यांवर पोलिसांकरवी धाकदडपशाही करुन जमीन बळकावण्याचा सिडकोचा डाव असून, कदापि सहन केले जाणार नाही, अशा तीव्र शब्दात शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी सरकारचा निषेध केला. सिडकोचे चेअरमन असलेले नेते शेतकर्यांचे कधीच होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी स्थानिक आमदारांचे नाव न घेता केली. शुक्रवारी (दि. 19) शहरातील शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नैना विरोधी जाहीर जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्प शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी, सोसायटी सदनिकाधारक, बांधकाम व्यावसायिक आणि इतर संघटनाच्या वतीने आयोजित या मेळाव्यात आ. जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हा सल्लागार बबन पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकार नैना प्रकल्प जबरदस्तीने लादत असून, तालुक्यातील शेतकर्यांना हा प्रकल्प नको असल्याचे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी बोलून दाखवले. यावेळी आ. जयंत पाटील यांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात बोलताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर बोलताना सिडकोचे चेअरमन असलेले नेते शेतकर्यांचे नेते कधी होऊच शकत नाहीत, अशी टीका केली. सिडकोकडून तालुक्यातील अनेक गावात नैना प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न सुरु असून, शेतकर्यांवर पोलिसांकरवी धाकदडपशाही केली जात असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांमध्ये यामुळे प्रचंड रोष असल्याचे या वेळी पाहायला मिळाले.
शेतकर्यांकडून लढाईचे हत्यार
नैना प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकर्यांनी आरपारच्या लढाईचे हत्यार उपसले आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, पनवेल, उरणमधील 270 पेक्षा अधिक गावे विमानतळबाधित म्हणून अधोरेखित करण्यात आली आहेत. यासाठी शेतकर्यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसवण्यासाठी सिडको प्रयत्नात आहे; पण शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रकल्पबाधितांकडून केला जात आहे. तसेच भूमिधारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करून शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव असल्याने नैना क्षेत्रातील 23 गावांनी या प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्षाची तयारी केली आहे.