। मुंबई । प्रतिनिधी ।
पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही. कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नसल्याचे ठरवले आहे. निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या, नाहीतर नका देऊ, असे म्हटले तरीसुद्धा लोक मत देतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि.27) मुंबई येथे केले. अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंटच्या दीक्षांत कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर भर दिला. मुंबई-पुणे महामार्ग बांधला. त्यावेळी टोलच्या नावाने ओरड सुरू झाली होती. त्यावर वेळ तुमचा वाचला. वाहतूक कोंडी कमी झाली. पेट्रोल डिझेलची बचत झाली ना, मग त्याचे पैसे टोलला द्यावे, असा मुद्दा मांडला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले असल्याचे सांगत लोकांना तुम्ही चांगली सेवा दिल्यास ते पैसे काढण्यास तयार होतील. आता तुम्ही नरिमन पॉईंट ते वसई असा प्रवास अवघ्या 15 मिनिटात करणार आहात. त्यासाठी काम सुरू आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.