। उरण । घन:श्याम कडू ।
उरण, पनवेल तसेच रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांची जोरदार मागणी असलेली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास अखेर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारने समोपचाराची भूमिका घेत, या प्रकल्पास दिवंगत लोकनेते. दि. बा पाटील यांचे नाव देण्याचे जाहिर केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी (दि.28) महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला रायगड जिल्हा महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते. यावेळीस नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव देण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली. यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं कि, या विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव सिडकोने घेतला होता. महाविकास आघाडी सरकाने नव्हता घेतला. त्यामुळे सिडकोने घेतलेल्या ठरावाला कोणीच पाठिंबा किंवा तो ठराव आम्ही पुढे केला नाही. तेथील स्थानिक जनतेची मागणी आहे कि, तेथील विमानतळास दिवंगत. लोकनेते.दि. बा पाटील यांचे नाव देण्यात यावे. यात काही गैर नाही. कारण दि. बा. पाटील हे आमचे मोठे नेते होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले असल्याची माहिती रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी दिली.
यासाठी शेकापचे आ. बाळाराम पाटील, उरण पनवेल महाविकास आघाडीचे नेते बबनदादा पाटील, द्वारकानाथ भोईर, काँग्रेसचे नेते आर. सी.घरत, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे, शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुदाम पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. याबद्दल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानले.