पर्यटन वाढल्याचा परिणाम
| माथेरान | वार्ताहर |
शहरात 20 ई-रिक्षा वर्षभरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत. मात्र पावसाळी पर्यटनात झालेली वाढ लक्षात घेता आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा सेवा देणे बंधनकारक असल्याने माथेरान शहरात सुरू असलेल्या 20 ई-रिक्षा अपुर्या पडत आहेत. याकरिता याठिकाणी ई-रिक्षांच्या संख्येत वाढ करण्याची अत्यंत गरज असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान पर्यटनस्थळी प्रायोगिक तत्त्वावर प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणार्या ई-रिक्षा सुरू झाल्या आहेत. ई-रिक्षांमुळे शाळेत दूरवर जाणार्या विद्यार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना येणार्या जेष्ठ पर्यटकांना येथे माथेरान शहरात दाखल होणे सोईस्कर झाले आहे. या ई-रिक्षा सुरू झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली येथे दिसत आहे. यंदा पावसाळ्यात सुद्धा दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक या पर्यटनस्थळी दाखल झालेले पहावयास मिळाले. या मुळे येथील व्यवसायात आणि पालिकेच्या तिजोरीत चांगलीच भर पडलेली दिसून आली माथेरान मधील वाढते पर्यटन पाहता येथे सुरू असलेल्या 20 ई-रिक्षा स्थानिकांना आणि पर्यटकांना सेवा देण्यास अपुर्या पडताना दिसत आहेत. याठिकाणी ई-रिक्षा करिता तांसन्तास पर्यटक रांगेत उभे असल्याचे चित्र अनेकदा येथे पहावयास मिळते. त्याच बरोबर येथे स्थानिकांना देखील ई-रिक्षा साठी बराच वेळ वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी साडेसहा वाजेपासून ई-रिक्षा सुरू होतात. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत येथे ई-रिक्षाची बॅटरी डिस्चार्ज होऊन ई-रिक्षा पुन्हा साडे तीन ते चार तास चार्जिंग साठी बंद करावी लागते. मग अश्यावेळी फक्त तीन ते चार ई-रिक्षा नागरिकांना आणि पर्यटकांना येथे सेवा पुरवीत असतात. त्यामुळे अनेकवेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते. यावर ई-रिक्षांची संख्या वाढवणे हा एकमेव पर्याय असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरान पर्यटनस्थळी प्रयोगिक तत्वावर ई-रिक्षा सुरू झाल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने सनियंत्रण समितीला ई-रिक्षांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार दिलेला आहे. संघटनेच्या वतीने ई-रिक्षांची संख्या वाढवण्याची सातत्याने मागणी करीत आहोत.स्थानिकांनी देखील ई-रिक्षांची संख्या वाढावी यासाठी मागणी केल्यास सनियंत्रण समितीला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल.सर्वांच्या प्रेयत्नाने हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
सुनिल शिंदे,
सचिव, रिक्षा संघटना
माथेरान शहरात सध्या स्थितीत वीस ई-रिक्षा सुरू आहेत.त्यापैकी पंधरा ई-रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना सेवा देत असतात आणि फक्त पाच ई-रिक्षा येथे नागरिकांना आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असतात.प्रवासी संख्या ही जास्त आणि ई-रिक्षा कमी अशी सध्या स्थिती आहे.आमच्या रग्बी विभागात सुद्धा पेमास्टर पार्क पर्यंत ई-रिक्षा सेवा मिळावी अशी आमची मागणी आहे.अश्या आशयाचे निवेदन देखील आम्ही मुख्याधिकारी यांना दिले आहे.याकरिता ई-रिक्षांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे.ई-रिक्षा आणखीन सुरू झाल्या तर याठिकाणी सर्वांना योग्य सेवा मिळेल.
शैलेंद्र दळवी,
माजी अध्यक्ष कोकणवासीय समाज संस्था, माथेरान