। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागच्या समुद्रात उभा असलेला, हिंदवी स्वराज्याची सागरी राजधानी म्हणून ओळखला जाणार्या कुलाबा किल्ल्यावर एक नवीनच प्रार्थनास्थळ उभे राहिले आहे. रायगड किल्यावरील प्रकार उघडकीस आल्यानंतर कुलाबा किल्ल्यावरही नवीन प्रार्थनास्थळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच माघी गणेश जयंतीच्या उत्सवाच्या वेळी मंडपाचे खांब उभारण्यासाठी आक्षेप घेणारे पुरातत्व खात्याचे अधिकारी थेट किल्ल्याच्या तटबंदीवर हे अनधिकृत बांधकाम होत असतांना झोपले होते का? असा संतत्प सवाल रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सुमारे शेवटचे बांधकाम असलेल्या किल्ल्यात कोणाचीही समाधी असल्याचा कागदोपत्री कुठेही उल्लेख अथवा नोंद नाही. असे असताना अचानक त्याठिकाणी प्रार्थनास्थळ अथवा समाधी कोणी बांधली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, असेही रघुजीराजे आंग्रे यांनी म्हटले आहे.
![](http://krushival.in/grygrars/2022/01/raghuji-raje-461x1024.jpeg)
अगदी याच प्रकारे अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याच्या समोरच रस्त्याच्या मध्यभागी एक अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम समाजातील अनेक जण स्वराज्यासाठी लढले. त्यांचा आदरच करतो. मात्र पुरातत्वीय महत्वाच्या किल्ल्यावर आणि परिसरात अशा प्रकारे अनधिकृतपणे बांधकामे, अतिक्रमण करणे चुकिचे असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पुरातत्व विभागाकडे पुराव्यासहित तक्रार केली आहे.