ग्रामस्थांना करावी लागतेय तारेवरची कसरत
। नेरळ । प्रतिनिधी ।
हुतात्मा हिराजी पाटील यांचे गाव असलेल्या मानिवली ग्रामस्थांच्या समस्यांकडे बघायला कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी वेळ नाही. पावसाळ्यात पोश्री नदीला आलेल्या महापुरात मानिवली गावाची स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे, त्याचवेळी नदीच्या पलीकडे जाण्यासाठी महत्वाची गरज असलेला पूल देखील होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्जत तालुक्यातील मानिवली गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्या गावातील स्मशानभूमी पोश्री नदीच्या बाजूला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने बनविलेला रस्ता यावर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरात वाहून गेला आहे.कर्जत तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने 22 जुलै रोजी कर्जत तालुक्यातील सर्व नद्या मध्यरात्री दुथडी भरून वाहू लागल्या आणि त्या महापुरात कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. त्यात मानिवली गावातील स्मशानभूमीकडे जाणारा अर्धा रस्ता वाहून गेला असून त्या सर्व रस्त्याचा मातीचा भराव बाजूच्या शेतांमध्ये गेल्याने त्या शेतांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शेतीचे झालेले नुकसान आणि वाहून गेलेल्या रस्त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या परीने आपल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना याबाबत भेट घेऊन कळविले. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्याची माहिती देणारे निवेदन येथील स्थानिक आमदार, जिप अभियंता यांनाही दिले. परंतु आजपर्यंत मानिवली गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काही दुरुस्त झाला नाही कि त्या रस्त्याची डागडुगी देखील मागील पाच महिन्यात होऊ शकली नाही. तरी येथील राजकीय पक्षाचे मतभेद विसरून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि पोश्री नदीवर पूल बांधण्यात यावा अशी कळकळीची मागणी श्रीराम डायरे यांनी केली आहे.
- मानिवली येथील महापुरात वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली आहे. आम्ही तेथे जाऊन मोजमापे घेतली होती आणि त्या कामाचे अंदाजपत्रक बनवून जिल्हा परिषदेकडे पाठवले आहे. निधी प्राप्त होताच तात्काळ रस्त्याचे काम केले जाईल. – प्रल्हाद गोपाने, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग