। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रावर करोना संसर्गाच्या तिसर्या लाटेचे संकट घोंगावू लागले असतानाच सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध यंत्रणांकडून नेमक्या स्थितीचा आढावा घेऊन सूचना देत आहेत. आजही मुख्यमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्षांना गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे माध्यमांशी बोलले व राज्यातील कोविड निर्बंध आणि नाइट कर्फ्यू याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. करोनाच्या तिसर्या लाटेचा धोका पाहता गर्दी टाळा, कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वांनाच केले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यालाच अनुसरून अधिक तपशील दिला आहे.
वडेट्टीवार यांनी नव्याने काही निर्बंध लागण्याची स्पष्ट शक्यता बोलून दाखवली. ममुंबई आणि पुणे या शहरांसह काही भागात करोनाचे रुग्ण परत एकदा वाढताना दिसत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर होत असलेली ही रुग्णवाढ पाहता लोकांनी गर्दी टाळली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. काही नवे नियम तसेच निर्बंध लावले जाऊ शकतात. त्याबाबत मुख्यमंत्री एक दोन दिवसांत तज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घणार आहेत, असे नमूद करत गणेशोत्सव काळात निर्बंध कडक केले जाण्याचे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले.