भुषणला कोणताही आजार नव्हता
| अलिबाग | प्रतिनिधी |
मागील दहा वर्षात माझ्या भावाला कोणताही आजार नव्हता. त्याला कोणत्याही प्रकारचे औषध वा गोळी सुरू नव्हती. त्याला फीटचा आजार असता तर तसे औषधोपचार सुरू असते. पण, असा कोणताही आजार नव्हता, असा दावा बनावट नोटा प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला आणि उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या भूषण पतंगेचा भाऊ मनोज पतंगे यांनी केला आहे. भूषणच्या पत्नीनेसुद्धा याला दुजोरा दिला आहे. तिनेसुद्धा भूषणला कोणत्याही प्रकारचे औषध वा गोळी सुरू नसल्याचे सांगितले आहे.
माझा नवरा आरोपी आहे की नाही, ही बाब न्यायालयात सिद्ध होईल ना! पोलिसांचे काम तपासाचे असून, त्यांनी तो करावा. जेव्हा भूषणला अटक झाली, तेव्हा तो चालत गेला. तो जर आजारी असता, तर चालूही शकला नसता! त्याला मारझोड करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? कारण, ज्यावेळी भूषणला अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. तेव्हा मी त्याला भेटले. तेव्हा त्याच्या कमरेवर मारल्याचे लाल निशाण मला दिसले, असे पत्नीने सांगितले. तेव्हा त्याला विचारले असता, पोलिसांनी मला मारले असे भूषणनेच सांगितले, असे पत्नी म्हणाली.
पोलीस कोठडीत असताना भूषणची तब्येत बिघडल्याने त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, त्याला सीटीस्कॅन करण्यासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. कामोठे येथे नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचे सांगत पोलिसांनी त्याला खासगी रुग्णवाहिकेतून कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केल्याचे भूषणच्या पत्नीने सांगितले. एमजीएम रुग्णालयात भूषणचे सीटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या रिपोर्टमध्ये काहीच आढळून आले नाही, परंतु रुग्ण आरोपी असल्याने तेथील रुग्णालयाने त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविल्याचेही पत्नीने सांगितले. त्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे भूषणला जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. सुरुवातीस त्याच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. तो उपचारास चांगला प्रतिसादही देत होता. परंतु, जे.जे.तील पहिल्या दिवसापासून माझ्यासह घरातील कोणाही व्यक्तीला पोलिसांनी भूषणला भेटू दिले नाही. त्याची विचारपूसही करु दिली नाही, असा आरोपही भूषणच्या पत्नीने केला आहे. माझा नवरा चांगला चालता-फिरता असताना, त्याला कोणताही आजार नसताना आधी फीट येतेय म्हणून उपचार सुरू आणि मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे सांगत डॉक्टरांचा अहवाल दाखवत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकून बंदोबस्त केलाय, असा आरोपही भूषण्ाचा भाऊ मनोज आणि पत्नीने केला आहे.
शवविच्छेदनापासून आम्हाला लांब ठेवले
भूषणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे आम्हाला सांगण्यात आले. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. आम्ही जेव्हा भूषणला पाहिले तेव्हा त्याच्या कमरेवर आणि खालच्या बाजूला तर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी मारले नाही, मग या जखमा कसल्या होत्या? त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित पोलिसांनी आम्हाला भूषणच्या शवविच्छेदनाच्या वेळी कुटुंबातील एका उपस्थित राहावे लागेल, असे सांगितले. आम्ही होकार दिला होता, असे भाऊ मनोज यांनी सांगितले. भूषणचा मृत्यू शुक्रवारी झाला, परंतु त्यादिवशी त्याचे शवविच्छेदन न करता, मृतदेह शवागरात ठेवण्यात आला. त्याचे शवविच्छेदन शनिवारी कुटुंबाला विश्वासात न घेताच करण्यात आले, यामागचे गौडबंगाल काय? आम्हाला या शवविच्छेदनापासून लांब का ठेवण्यात आले? असा प्रश्न भूषणची पत्नी आणि भावाने उपस्थित केला आहे.
आरोप सिद्ध झाले का?
संशयित आरोपी म्हणून भूषणला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी जेव्हा कारवाई केली, तेव्हा मी आणि मुलगा घरात होतो, असे भूषणच्या पत्नीने सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा घरात सापडलेल्या नाहीत, तसेच जे प्रिंटर या तपासादरम्यान जप्त केलेय, असे पोलीस सांगत आहेत, ते प्रिंटरही घरात मिळालेले नाही, असा दावाही भूषणच्या पत्नीने केला आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालय जी काय शिक्षा द्यायची, देऊ दे. परंतु, कायदा हातात घेऊन मारणे कितपत योग्य आहे? आज माझा नवरा या जगात नाही. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मुलाच्या डोक्यावरील बापाचे छत्र हरपले असून, तो पोरका झाला आहे.
तपास सीआयडीकडे
भूषण पतंगे मृत्यूप्रकरणी आता सीआयडीमार्फत तपास सुरू करण्यात आला. अलिबागमधील जिल्हा कारागृह आणि अलिबाग पोलीस ठाणे येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच तपासिक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.






