नेरळ | वार्ताहर |
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात अनुदान वाटप केले जात आहे. योजनेतील एकही लाभार्थी अनुदान आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किट पासून वंचित राहणार नाही असा विश्वास रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. कर्जत तालुक्यातील पिंगळस येथे शासनाच्या खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते,त्यावेळी अदिती तटकरे बोलत होत्या.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रौखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे,अनुसुचित जमातिच्या कुंटूबियासमोर बेरोजगारीचा प्रश्र निर्माण होउन उपासमारीची वेळ आल्याने शासनाने अनुसुचित जमातीच्या कुंटूबियांना खावटी योजने अंतर्गत 50 टक्के रोकड आणि 50 टक्के वस्तु अनुदान स्वरुपात वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या 48 हजारहून अधिक लाभार्थ्यांना आदिवासी विभागांतर्गत खावटी अनुदान योजनेतून अन्नधान्य वाटप केले जात आहे.कर्जत तालुक्यातील लाभार्थी यांना प्राथमिक स्वरूपात या खावटी योजनेतील अनुदान वाटपाचा शुभारंभ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तालुक्यातील पिंगळस येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाचे ठाणे विभागीय आयुक्त गिरीश सरोदे,रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे,जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले,नरेश पाटील,आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव,कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड,सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडकर,स्थानिक मोग्रज ग्रामपंचायत सरपंच रेखा देशमुख,रजपे ग्रामपंचायत सरपंच दीपाली पिंगळे,माजी सरपंच हरेश घुडे,राष्ट्रवादी युवक नेते भास्कर दिसले,जिल्हा सरचिटणीस भूषण पेमारे आदी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील अनुसूचित जमाती लाभार्थी यांना खावटी अनुदान वाटप आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप पालकमंत्री अदिती तटकरे यांचे हस्ते झाले.त्यानंतर पालकमंत्री तटकरे यांनीयांनी पिंगळस शासकीय आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली. त्यावेळी मुख्याध्यापक एस एन मागाडे यांनी आश्रमशाळेच्या प्राथमिक,माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय ची शैक्षणिक प्रगती बद्दल पालकमंत्र्यांना माहिती दिली.