। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत या म्हणाले तरी आता पुन्हा मातोश्रीवर जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षूण सांगितले. मुलाखत देताना या सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असेल असा दावाही केला.
या प्रदीर्घ मुलाखतीत बोलताना शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी बंडामागचं कारणदेखील सांगितलं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहेत, पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारचा रिमोट तुमच्या हातात असणार की फडणवीसांच्या? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, आम्ही दोघे चांगले मित्र असून एकमेकांना विश्वासात घेऊन काम करु. आमच्या दोघांचा पर्सनल अजेंडा काही नसून राज्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा आहे. असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
हा निर्णय मी फक्त माझ्या खच्चीकरणामुळे घेतलेला नाही. जे 25-30 आमदार होते, त्यांना रोज येणारा अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न यामुळे पुन्हा निवडून येण्याची चिंता सतावत होती. कारण पडलेल्या उमेदवाराला घटक पक्ष ताकद देऊ लागले आणि आमच्या लोकांचं खच्चीकरण करु लागले. आमच्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करण्यात आलं. निर्दोष असतानाही मोक्कासाऱख्या कारवाईंना सामोरं जावं लागलं.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आमदारांचं भवितव्य धोक्यात होतं
मुख्यमंत्री आमचा असताना नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. असंच सुरु राहिलं तर या 30-40 आमदारांचं भवितव्य 100 टक्के धोक्यात आलं असतं. यामुळेच आमदारांना मला निर्णय घ्या, अन्यथा आम्ही वेडावाकडा निर्णय घेऊ सांगितलं, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
भाजपसोबत युती करण्याचा योग्य निर्णय
हा एका दिवसात झालेला प्रकार नाही. आमदारांचा त्रास रोज वाढत होता. आम्ही हे सांगण्याचा प्रयत्नही केला. पुन्हा भाजपासोबत युती करु शकतो का, यासंबंधी विचारणाही केली. पण त्यात आम्हाला यश आलं नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. नाईलाज म्हणून हा निर्णय घेतला, पण आम्ही भाजपाशी युती करुन चुकीचा निर्णय घेतला नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. ठाण्यात पाऊस कोसळत असतानाही हजारोंच्या संख्येने लोक वाट पाहत उभे होते. चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे शिवसैनिक आमच्यासोबत उभे राहिले नसते, असं एकनाथ शिदेंनी सांगितलं.