आता पुनर्वसन नकोच; आमचे गाव आम्हाला द्या

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची आग्रही मागणी
| उरण | प्रतिनिधी |
वाळवीग्रस्तगाव म्हणून गेली 35 वर्षे मरणयातना भोगणार्‍या हनुमान कोळीवाडा या उरण तालुक्यातील पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी आपल्या मूळ गावाचा ताबा घेणे सुरू केले आहे. जुन्या गावाची ओढ आबालवृद्धांना लागल्याने आता पुनर्वसनाच्या चर्चा बस झाल्या, आम्ही आमचे जुने गाव पुन्हा उभारु, असा निर्धार हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केला आहे.

जेएनपीटी बंदराच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पदरी गेल्या 35 वर्षांपासून घोर निराशा पडली आहे. विस्थापित गावाचे पुनर्वसन झाले, मात्र त्यानंतर या गावाच्या नागरी सुविधांकडे जेएनपीटी प्रशासनाने सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या गावाची पार दुर्दशा झाली होती. या गावातील जनतेच्या कोणत्याच मागणीसाठी जेएनपीटी प्रशासन सकारात्मक नसल्याने या ग्रामस्थांनी आता आमचे पुनर्वसन नको, आता आम्हाला आमचे निसर्ग संपन्न गाव परत द्या, असा आग्रह धरीत त्यांच्या जुन्या गावाची साफसफाई जोरात सुरू केली आहे. आपल्या मूळ गावात परत असल्याने गावातील बुजुर्ग व तरुण पिढीला जुन्या गावाचा लळा लागल्याचे दिसून येत आहे.

गेल्या सहा दिवसांपासून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची आपल्या मूळ गावाच्या जागेची साफसफाई हाती घेतली असून, गावातील शेकडो ग्रामस्थ साफसफाईच्या कामात सहभागी होत आहेत.आमचे निसर्ग संपन्न गाव जे एन पी टी प्रशासनाने ताब्यात घेवून तेथे कुठलाच प्रकल्प न करता गावाचे जंगल केले आहे. मग आम्हाला गावातून कोणत्या उद्देशाने बाहेर काढले, असा सवाल विचारीत आवतील आबालवृद्ध आपल्या जुन्या गावात येवून साफसफाई बरोबरच निसर्गसंपन्न जुन्या गावात भजन कीर्तन करण्याबरोबरच सामूहिक भोजनचाही आस्वाद घेत आहेत. आपल्या मूळ गावात राहूनही आम्ही अजून सुखी व सुदृढ होऊ, असा विश्‍वास अनेकांनी व्यक्त केला.

जे एन पी टी बंदरासाठी आम्ही त्याग करून गावातून विस्तापित झालो. मात्र जे एन पी टी प्रशासनाने आम्हाला गेली 35 वर्षे फक्त आश्‍वासने नि नरकयातना दिल्या. गावाला ना कुठल्या सुविधा दिल्या, ना कसला विकास केला. आता आम्हाला विकास व पुनर्वसनाच्या चर्चा नकोत, तर आम्हाला आमचे मूळ गाव हवे आहे. या गावात आम्ही नक्की सुखाने राहू. – सुरेश कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा

Exit mobile version