ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा दावा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत हा धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी लाडका तालुका राहिला आहे. यामुळे शिवसेनेचा महामेरू कोणीही रोखू शकत नाही असा विश्वास शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला. कळंब येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्जत विधानसभा मतदारसंघातील कळंब जिल्हा परिषद गट विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे संघटक भरत भगत यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. समारंभास नवीन घाटवळ, भाई शिंदे, भाई गायकर, उत्तम कोळंबे,एकनाथ पिंगळे, बाबू घारे, सुदाम पवाळी, नितीन सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेचा संपर्क कार्यालयाचे उद्घटन केल्यानंतर शिवसैनिक यांच्याशी संवाद साधताना केदार दिघे यांनी या तालुक्यातील शिवसैनिक यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना साथ दिली होती. ठाणे जिल्ह्यात काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यावर आनंद दिघे हे कर्जत तालुक्यात आपल्या हक्काच्या शिवसैनिक यांच्याकडे यायचे आणि आनंदी राहायचे.त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कर्जत तालक्याविषयी आणि येथील कट्टर शिवसैनिक यांच्या विषयी आस्था आणि आपुलकी होती. तशीच आपुलकी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रामुख्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य राहिलेल्या कर्जत तालुक्याला बद्दल वाटत असते असे ते म्हणाले.