आता आमदार, स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची घोषण

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात गुरुवारी (दि. 17) झालेल्या हाणामारीमुळे विधानसभेची बदनामी झाली आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संसदेच्या नीतिमत्ता समितीच्या धर्तीवर विधान परिषदेच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर येथेही अशीच एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा केली. यासोबतच त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, पुढील अधिवेशनापासून फक्त विधिमंडळाचे सदस्य, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि सरकारी अधिकारीच विधानमंडळाच्या आवारात प्रवेश करू शकतील. इतर कोणत्याही व्यक्तीला आवारात प्रवेश दिला जाणार नाही.

गुरुवारी या घटनेत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आणि दुसऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत प्रवेश पासशिवाय विधानसभा परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. यावर सभापतींनी दोन्ही आमदारांना सभागृहात माफी मागण्याचे सुचवले. दोन्ही सदस्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. हाणामारीत सहभागी असलेल्यांपैकी एक जण आव्हाड यांच्यासोबत होता, तर उर्वरित सहा ते सात जण पडळकर यांच्यासोबत आले होते. या सर्वांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर विशेषाधिकार उल्लंघनाची कारवाई देखील सुरू केली जाईल. .त्या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. दोन्ही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version