सेंद्रिय शेतीला मिळणार प्रोत्साहन

जैविक शेती मिशन योजनेला माणगावात सुरुवात

। माणगाव । वार्ताहर ।

शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर, त्यामुळे खालावलेला जमिनीचा पोत तसेच, रासायनिक किटकनाशकाच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेची सुरुवात कृषी विभागमार्फत माणगाव तालुक्यात करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित करून त्याबाबतची शेतकर्‍यांची जनजागृती, शिबिरे, मार्गदर्शन शेतकर्‍यांना दिले जाणार असून सेंद्रिय शेतीमुळे घटत चाललेल्या पिकाच्या उत्पादनात मोठी वाढ होणार असून शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांचा सहभाग वाढवत त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे पिकाच्या भरीव उत्पादनासाठी अगामी काळात सेंद्रिय शेतीला सुगीचे दिवस येणार आहेत.

या योजनेचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे. ही योजना 100% अनुदानावर राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांतून शेतकर्‍यांना मदत करणार आहे. त्यासाठी तालुक्यातील जास्तीत ज्यास्त शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अजय वगरे यांनी केले आहे. योजनेचा उद्देश डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. यामुळे रसायन अवशेषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, तिचा इतरत्र प्रसार करणे, शेतकर्‍यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी योजनेची उद्दिष्टे असतील. या योजनेत सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या उत्पादक कंपनीची देखील नोंदणी करण्यात येईल.

अशी राबविली जाईल योजना
एक किंवा सलग क्षेत्र असलेल्या गावात किमान 10 हेक्टर ते 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट तयार करावा लागेल. एका शेतकर्‍याला जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड केली जाईल. सहभागी शेतकर्‍यांना लागवड ते काढणीपर्यंत प्रशिक्षणे दिली जातील. सेंद्रिय शेतीसाठी लागणार्‍या सर्व निविष्ठा कशा तयार कराव्यात, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. शेतीचे प्रमाणीकरण करून शेतीमालाचे ब्रँडिंग केले जाईल. सहभागासाठी तालुका स्तरावरील कृषि सहाय्यक व आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांकडे संपर्क साधावा. या योजनेमध्ये सन 2024-25 या वर्षासाठी माणगाव तालुक्यासाठी 500 हेक्टर क्षेत्राचा लक्षांक प्राप्त असून गट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या योजने अंतर्गत लागवड ते काढणी, ब्रँडिंग व मार्केटिंग, प्रमाणीकरणापर्यंत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येईल तरी, माणगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, आदिवासी शेतकरी, शेतकरी गट यांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

– अजय वगरे, तालुका कृषी अधिकारी माणगाव

Exit mobile version