प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावपातळीवरील विशेष मोहिमेचे आयोजन

| रायगड | वार्ताहर |

पी. एम. किसान योजनेच्या 16 वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी.एम. किसान योजनेच्या या 45 दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी.एम. किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, पुणे दिलीप झेंडे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी.एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

या अनुषंगाने डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version