‘आपली बस, आपली सेवा’ अभियान जाहीर
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील एसटी प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘आपली बस, आपली सेवा’ हे नवे अभियान जाहीर केले आहे. हा उपक्रम 1 मेपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवेमध्ये शिस्त, स्वच्छता आणि मानवी दृष्टिकोनाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बसची संख्या वाढत असली तरी प्रवाशांची संख्या आणि महसूल अपेक्षित प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच, या अभियानांतर्गत चालक आणि वाहक यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिला जाणार आहे. बस सुटण्यापूर्वी स्वच्छता, वेळेवर उपस्थिती, नीटनेटका गणवेश आणि शिस्तबद्ध वागणूक या गोष्टी अनिवार्य करण्यात येणार आहेत. तसेच चालकाने प्रवासाची माहिती देत प्रवाशांशी संवाद साधण्यावरही भर दिला जाणार आहे. 1 मेपासून सुरू होणारे हे अभियान केवळ सेवा सुधारणा नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे एसटी प्रवास अधिक सुखद, सुरक्षित आणि समाधानकारक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रवाशांनाही जबाबदारी
एसटी प्रशासनाने प्रवाशांनाही जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले आहे. बस आणि स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे आणि मोठे सामान योग्य ठिकाणी ठेवणे या बाबींचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि ऑनलाइन आरक्षणाचा वापर वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार
बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था त्वरीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानके स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच, प्रवाशांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. सेवेतील त्रुटी ओळखून त्यात सुधारणा करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिक एसटी सेवेचा वापर करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





