मजुरांअभावी कामे खोळंबली
| चिरनेर | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात भात कापणीला जोरदार सुरुवात झाली असून, कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, तरीदेखील अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहेच. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरू आहे. परंतु, भात कापणीकरिता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, नाईलाजाने शेतकरी आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडपे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून, त्यानंतर त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती.
परंतु, सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भातपीक झोडून भात घरी आणत आहेत. उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु मागील काही वर्षांपासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने, तसेच येथील औद्योगिकीरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वीइतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही.त्यात भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला, तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडीखाली न आणता त्या ओसाड ठेवल्या आहेत. त्यामुळे या भागात शेतीकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.
ज्या मूठभर शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली आहे. अशाही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भातशेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने रानडुकरांचा वनविभागाकडून बंदोबस्त करावा, अशी मागणी उरण परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांची मळणीची घाई
मुरूड तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सायंकाळी पडलेल्या पावसाने कापणी करून वाळण्यासाठी ठेवलेले भाताचे पीक भिजवून टाकल्याने मुरूड, नांदगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी त्याची उडवी रचून ठेवण्यापेक्षा सरळसरळ मळणीच करून मिळेल तेवढे पीक पदरात पाडून घेण्यासाठी घाई सुरू केली आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/11/MURUD-7-1024x421.jpg)
मळणीसाठी जसे मिळतील तसे कामगार घेऊन त्यांनी पिकलेला दाणा आपल्या कोठारात आणून टाकण्याचा सपाटा लावला आहे. सध्या येथे ढगाळ वातावरण असल्याने काही शेतकरी पावसाचे मळभ दूर होण्याची वाट पाहत कापणी करण्यासाठी थांबले आहेत त्यामुळे तयार दाणा गळून जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी दैवावर भरोसा ठेवत कापणी केली आहे. काही शेतकरी भिजलेले भाताचे तण उलट सुलट करीत त्यांना वाळण्यासाठी मेहनत घेत आहेत.